पुढारी ऑनलाईन डेस्क : Gaikwad vs Easwaran : भारतीय संघाला नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. तेथे दोन्ही संघांमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे 5 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. यावेळी यशस्वी जैस्वाल हा रोहित शर्मासह भारताचा मुख्य सलामीवीर असेल. यासोबतच भारतीय संघ बॅकअप ओपनिंग बॅट्समनलाही सोबत घेऊन जाईल. यासाठी अभिमन्यू इश्वरन आणि ऋतुराज गायकवाड या दोन खेळाडूंची नावे आघाडीवर आहेत. ऑस्ट्रेलिया दौरा लक्षात घेऊन ऋतुराजला बांगलादेश विरुद्धच्या टी-20 मालिकेऐवजी इराणी कपमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली आहे.
29 वर्षीय अभिमन्यू इश्वरन हा बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने 2013 मध्ये पदार्पण केले. ईश्वरनने आतापर्यंत 98 सामन्यांच्या 167 डावांमध्ये 7506 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 49.38 राहिली आहे. यामध्ये 26 शतके आणि 29 अर्धशतकांचा समावेश आहे. ईश्वरन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नुकतेच त्याने देशांतर्गत हंगामात खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांमध्ये चार शतके झळकावली आहेत. इराणी चषकाच्या पहिल्या डावात त्याने 191 धावा केल्या. ईश्वरन अनेकवेळा टीम इंडियात आला आहे पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. यासोबतच तो भारत अ संघाचा कर्णधारही आहे.
27 वर्षीय ऋतुराज गायकवाडने भारताकडून एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळले आहेत. त्याने टी-20 मध्ये कर्णधारपदही भूषवले आहे. त्याने 33 प्रथम श्रेणी सामन्यांच्या 56 डावात फलंदाजी केली आहे. यादरम्यान ऋतुराजने 42.24 च्या सरासरीने 2281 धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटमधून 6 शतके आणि 12 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वात मोठी खेळी 195 धावांची राहिली आहे.
ऋतुराजला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधारही आहे. तर ईश्वरनचे रेड बॉल क्रिकेटमधील रेकॉर्ड खूपच चांगले आहे. त्याला अधिक सामने खेळण्याचा अनुभवही आहे.