पुढारी ऑनलाईन डेस्क : India vs New Zealand, 1st Test | न्यूझीलंडने भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात रविवारी विजय मिळवला. न्यूझीलंडने कसोटीमध्ये तब्बल ३६ वर्षांनंतर भारतात विजय मिळवला. यापूर्वी १९८८ मध्ये वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडने शेवटचा १३६ धावांनी विजय मिळवला होता. हा विजय न्यूझीलंडसाठी विशेष ठरला असला तरी टीम इंडियाच्या जिव्हारी लागला आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) सामन्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. खेळात नेहमीच चढ-उतार असतात, परंतु अपयशानंतर प्रत्येक वेळी मजबूत होणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, असे पंतने पोस्टमध्ये लिहीले आहे.
न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटीत भारताला घरच्या मैदानावर पराभव पत्करावा लागला. सामन्यानंतर ऋषभ पंतने (Rishabh Pant) 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, खेळ तुमच्या मर्यादांची चाचणी घेत असतो. कधी तुम्हाला खाली पाडेल तर कधी तुम्हाला वरती ढकलेलं. पण ज्यांना हे आवडते ते प्रत्येक वेळी मजबूत होतात. प्रेम, समर्थन आणि उत्साह यासाठी बेंगळुरूच्या आश्चर्यकारक गर्दीचे आभार. आम्ही आणखी मजबूत होऊन पुनरागमन करू, असे पंतने म्हटले आहे. दरम्यान, भारताचा न्यूझीलंडविरूद्ध दुसरा कसोटी सामना २४ ऑक्टोबरपासून पुण्यात होणार आहे. (India vs New Zealand, 1st Test)
न्यूझीलंड संघाने भारताविरुद्ध ८ विकेटस्ने दणदणीत विजय मिळवला. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ स्पर्धेचाही भाग आहे. त्यामुळे या सामन्याचा परिणाम डब्ल्यूटीसी पॉईंटस् टेबलवरही झाला आहे. या पराभवानंतरही भारतीय संघ पॉईंटस् टेबलमध्ये अव्वल क्रमांक कायम आहे. मात्र, भारताची विजयी टक्केवारी घसरून ७४. २४ वरून ६८.०६ अशी झाली आहे. (India vs New Zealand, 1st Test)
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीला असल्याची कबुली कर्णधार रोहित शर्मान दिली आहे. आम्ही केलेल्या काही चुकांचे परिणाम भोगावे लागले, असे सांगून रोहित म्हणाला, याआधी देखील आम्ही अशा परिस्थितीचा सामना केला असून पुनरागमन कसे करायचे हे आम्हाला ठाऊक आहे. त्याच उद्देशाने पुढच्या सामन्यात उतरू. (India vs New Zealand, 1st Test)