Rishabh Pant Record SL vs IND: भारताचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंतने श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा आपला दांड पट्टा चालवला. त्याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अर्धशतक ठोकत भारताला ४०० धावांच्या पार पोहचवलं. ऋषभ पंतने ८८ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. त्यात सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे या दोन षटकारातील एक षटकार हा श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला चांगलाच खर्चात पाडणारा ठरला आहे. पंतने मारलेला पूल हा थेट स्टेडियमच्या छतावर बसवण्यात आलेल्या सोलार पॅनलला जाऊन धडकला अन् सोलार पॅनलचे नुकसान झाले.
पंतने आजच्या सामन्यात आपले २१ वे कसोटी अर्धशतक झळकावले. पंत आपला ५२ वा कसोटी सामना खेळत आहे. त्याने २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. याचबरोबर पंतने WTC मध्ये देखील एक धडाकेबाज कामगिरी केली. ऋषभ पंत हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताकडून सर्वाधिकवेळा अर्धशतकी खेळी करणारा खेळाडू ठरला आहे. २८ वर्षाच्या पंतने ४२ WTC सामन्यात २४ वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. यातील सहावेळा तो आपले अर्धशतक शतकात रूपांतरित करू शकला. तर १८ वेळा त्याने ५० पेक्षा जास्त धावा केल्या. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरूवात २०१९ मध्ये झाली होती.
ऋषभ पंतने भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाचे रेकॉर्ड मागे टाकले. स्टार जडेजाने आतापर्यंत ५० wtc सामन्यात २३ वेळा ५० पेक्षा जास्त धावांची मजल मारली. यात १८ वेळा अर्धशतकी खेळी तर ५ वेळा शतकी खेळीचा समावेश आहे.
आता भारताकडून wtc मध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्यांमध्ये पंत अव्वल असून जडेजा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत इंग्लंडचा जो रूट ४७ वेळा ५० पेक्षा जास्त धावा करून अव्वल स्थानावर आहे. त्याने २३ शतके आणि २४ अर्धशतके ठोकली आहेत. त्याच्या खालोखाल स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबूशेन हे संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत. या दोघांनी प्रत्येकी ३५ वेळा ५० धावांचा आकडा पार केला आहे.
ज्यो रूट - ४७
स्टीव्ह स्मिथ - ३५
मार्गन लाबुशेन - ३५
बाबर आझम - ३०
बेन स्टोक्स - २७
ट्रॅविस हेड - २६
हॅरी ब्रुक्स - २५
ऋषभ पंत - २४
जॅक क्रॉली - २४
रविंद्र जडेजा - २१
धनंजय डिसिल्वा - २३
धडाकेबाज फलंदाजी करत असताना ऋषभ पंत पहिल्या कसोटीत फिरकीपटू केशर नुवांथाचा शिकार झाला होता. पंत ११३ व्या षटकात बाद झाला. त्याने लाहिरूच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पंतने ध्रुव जुरेलच्या साथीने सातव्या विकेटसाठी ११२ धावांची भागीरादीर रचली. पंत बाद झाला त्यावेळी भारताच्या ४१९ धावा झाल्या होत्या. जुरेल शतकाच्या उंबरठ्यावर उभा होता.