PV Sindhu Return India: दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू ही इराण - इस्त्रायल-अमेरिका युद्धामुळं दुबईत अडकून पडली होती. एअर स्पेस बंद पडल्यामुळं तिला मायदेशात परत येणं अवघड झालं होतं. मात्र अखेरीस ती आज बंगळुरू इथं आपल्या घरी सुरक्षितरित्या पोहचली आहे. विशेष म्हणजे दुबई विमानतळाजवळ स्फोट झाल्यानं दुबईतून उड्डाण करणाऱ्या सर्व विमानसेवा रद्द करण्यात आल्या होत्या.
सिंधू ३ मार्च २०२६ रोजी बर्मिंघम येथे सुरू होणाऱ्या प्रतिष्ठित ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियनशिपमध्ये खेळणार होती. मात्र आता या युद्धजन्य परिस्थितीमुळं आणि विमान सेवा ठप्प झाल्यामुळं तिला या स्पर्धेतून आपलं नाव मागं घ्यावं लागलं. ही स्पर्धा BWF ची सुपर १००० होती. पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टीकोणातून ही स्पर्धा अत्यंत महत्वाची होती. आता सिंधूचे या स्पर्धेतून बाहेर होणे तिच्यासाठी खूपच अडचणीचे मानले जात आहे.
सिंधू आपल्या टीमसह तसेच इंडोनेशियाचे कोच इरवांस्याह यांच्यासह दुबईत अडकील होती. ती राहत असलेल्या ठिकाणी स्फोट झाले होते. त्यातून ती थोडक्यात बचावली होती. त्यांना ताबडतोब सुरक्षित स्थळी नेण्यात आलं होतं. मात्र स्थिती तणावपूर्ण झाल्यानं तिला विमान प्रवास करण्याच अडचणी येत होत्या. अखेर तिला आपलं नाव ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमधून मागे घ्यावं लागलं.
बंगळुरूमध्ये पोहचल्यावर पीव्ही सिंधूने सोशल मीडियावर पोस्ट केली. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते, 'गेले काही दिवस तणावपूर्ण आणि अनिश्चित राहिलं आहे. मात्र आता सुरक्षित घरी आल्यावर चांगलं वाटत आहे.' सिंधूने तिला सुरक्षित घरी पोहचवणाऱ्या दुबई प्रशासन, एअरपोर्ट स्टाफ, इमिग्रेशन अधिकारी आणि ग्राऊंड स्टाफचे विशेष आभार मानले. त्यांनी कठीण काळात सहानभूती आणि व्यावसायिक दृष्टीकोण दाखवला असंही सिंधू म्हणाली.
सिंधूने या मानसिक तणावाच्या वातावरणातून बाहेर आल्यावर आता आराम करणार असल्याचं सांगितलं. तिनं आता आराम करणार असून ट्रेनिंग कधी अन् कसं करायचं याबाबत विचार करणार असल्याचं सांगितलं.
दरम्यान, भारताचे माजी प्रशिक्षक विमल कुमार यांनी पीटीआयला सांगितलं की, सिंधू गाडीतून ओमानला जाण्याचा विचार करत होती. एक खेळाडू म्हणून हे खूप कठीण होतं. ती खूप चांगल्या तयारीत होती. त्यांचा संघ ऑल इंग्लंड स्पर्धेबाबत उत्साही होती. त्यांनी रस्ते मार्गाचा वापर करत ओमानला जाण्याचा विचार केला होता. मात्र ते खूप धोकादायक होत. त्यामुळं त्यांनी ही योजाना गुंडळून ठेवली.