पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघावर देशभरातून चौफेर टीका होत आहे. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डही सैरभेर झाले आहे. यातूनच पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी एक अजब दावा केला आहे. आता संघ निवडीसाठी चक्क आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)चा उपयाेग करणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पाकिस्तानमधील देशांतर्गत खेळाडूंच्या नावांची कोणतीही आकडेवारी नसल्याचा दावा केला, त्यामुळे निवड धोरण कठीण झाले आहे. आमच्याकडे बरेच खेळाडू आहेत ज्यांचे रेकॉर्ड आमच्याकडे नाही. चार-पाच खेळाडूंना काढून टाका. तुम्ही कोणाला तरी काढून टाकू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला त्याची जागा घेण्यासाठी कोणीतरी चांगले खेळाडू तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. आता आगामी चॅम्पियन्स चषक स्पर्धेसाठी संघ तयार करण्यासाठी बोर्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरत आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी खुलासा केला आहे की, आगामी चॅम्पियन्स चषक स्पर्धेसाठी संघ तयार करण्यासाठी बोर्ड कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरत आहे. पाकिस्तानला एक मजबूत क्रिकेट संघ देण्यासाठी 150 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यातील ८० टक्के खेळाडूंची एआय निवड करेल. तर निवड समितीला २० टक्के खेळाडूंची निवड करतील. कोणीही याला आव्हान देऊ शकत नाही. आता आमच्याकडे रेकॉर्ड्स असतील आणि आम्ही सर्वजण पारदर्शक पद्धतीने टीममध्ये स्थान मिळवण्यास पात्र आहोत. देशांतर्गत चॅम्पियन्स चषक सप्टेंबरमध्ये होणार आहे. या स्पर्धेत जे खेळाडू चकमदार कामगिरी करणार नाहीत त्यांना तत्काळ हटवले जाईल. आता संघातील खेळाडूची निवड कोणाच्याही वैयक्तिक मतांवर आणि इच्छांवर अवलंबून राहणार नाही, असाही दावा त्यांनी केला.
यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने आपल्या पाच दिग्गज क्रिकेटपटूंना चॅम्पियन्स कपमधील संघांचे मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले होते. यामध्ये मिसबाह-उल-हक, सकलेन मुश्ताक, सर्फराज अहमद, शोएब मलिक आणि वकार युनूस यांचा समावेश होता. हे माजी खेळाडू देशांतर्गत क्रिकेटपटूंचा खेळ सुधारण्यास मदत करतील, असे बोर्डने स्पष्ट केले होते.