नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन
यंदाच्या आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेण्यात आले आहे. भारताने पाकिस्तानमध्ये सामने खेळण्यास नकार दिल्यानंतर आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला मोठा धक्का बसला आहे.
आशिया चषकाच्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये होणार होती. पण, आत या स्पर्धेसाठी बांगलादेश, श्रीलंका किंवा दुबई या पर्यायांचा विचार केला जात आहे. ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषकच्या एक महिन्याआधी ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा होणाऱ्या विश्वचषक टी-20 ची तयारी करण्यासाठी आशिया चषक यावर्षी टी-20 स्वरूपात खेळवला जाणार आहे.
भारतीय संघानं सुरक्षेचे कारण दाखवताना पाकिस्तानात न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांनी स्पर्धेतून माघार घेण्याचेही सांगितले होते. अखेर आशियाई क्रिकेट असोसिएशनला ही स्पर्धा पाकिस्तानातून हलवावी लागली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध पाहता, या स्पर्धेवर प्रश्नचिन्ह सुरुवातीपासूनच उपस्थित केले जात होते.
आशिया कप स्पर्धा टी २० प्रकारात खेळली जाणार आहे. टी २० विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून आशिया कप स्पर्धा टी २० पद्धतीने खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच टी २० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे.
पाकिस्तानने २००८ एकदाच एशिया कप स्पर्धा आयोजित केली होती. त्या दरम्यान पाकिस्तानला फायनलमध्ये प्रवेश करता आले नाही आणि अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात रंगला. अजंथा मेंडिसने १३ धावांवर ६ गडी बाद करत श्रीलंकेला १०० धावांनी जिंकून दिला होता.