स्पोर्ट्स

Shreyas Iyer Asia Cup : ‘आमची चूक नाही… श्रेयसला वाट पाहावी लागेल’, अय्यरला वगळल्यावरून मुख्य निवडकर्त्यांचा खुलासा

Shreyas Iyer : २०२३ पासून पुनरागमनाच्या प्रतीक्षेत

रणजित गायकवाड

asia cup team india bcci cheif selector ajit agarkar on shreyas iyer

आशिया चषक २०२५ साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरला १५ सदस्यीय मुख्य संघात स्थान मिळालेले नाही, तसेच राखीव खेळाडूंच्या यादीतही त्याचा समावेश नाही. हा निर्णय क्रिकेट चाहत्यांसाठी आश्चर्यकारक ठरला आहे. अय्यरची अलीकडील कामगिरी उत्कृष्ट राहिलेली आहे. पण तरीही त्याला वगळण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान श्रेयस अय्यरची निवड न करण्यामागील कारण स्पष्ट केले आहे.

अय्यरला स्थान का मिळाले नाही?

श्रेयस अय्यरने अलीकडेच आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्सचे नेतृत्व करत आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले. या हंगामात त्याने फलंदाजीमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली. तो आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याने १७ सामन्यांमध्ये ५०.३३ च्या सरासरीने ६०४ धावा फटकावल्या.

दुबईत खेळवण्यात आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सामन्यांत अय्यरने भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या स्पर्धेत तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता आणि संघाला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला होता. या कामगिरीनंतरही, आशिया चषक २०२५ साठी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

यावर भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यरला संघात समाविष्ट न करण्याचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘अभिषेक शर्माने त्याचे काम कसे केले आहे ते तुम्ही पाहता आणि तो गोलंदाजी देखील करू शकतो, म्हणून यशस्वीला वाट पहावी लागेल. श्रेयस अय्यरच्या बाबतीतही असेच आहे. यामध्ये त्याची काहीही चूक नाही आणि आमचीही नाही. आम्हाला फक्त १५ खेळाडू निवडण्याची संधी मिळाली होती. जर जागा असती तर आम्ही निश्चितच श्रेयसला संघाचा भाग बनवले असते. त्याला संधीची वाट पाहावी लागेल.’

आगरकर यांच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, निवड समितीने एका वेगळ्या रणनितीसाठी हा कठीण निर्णय घेतला आहे, परंतु अय्यरच्या प्रतिभेवर आणि योगदानावर कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही.

२०२३ पासून पुनरागमनाच्या प्रतीक्षेत

उल्लेखनीय आहे की, श्रेयस अय्यरने भारतीय संघासाठी आतापर्यंत ५१ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ३०.६६ च्या सरासरीने ११०४ धावा केल्या आहेत. मात्र, त्याने भारतासाठी शेवटचा टी-२० सामना २०२३ साली खेळला होता. तेव्हापासून तो संघात आपले स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. त्याला २०२४ च्या टी-२० विश्वचषक संघातही स्थान मिळवता आले नव्हते आणि आता आशिया चषक संघातही स्थान मिळवण्यात तो अपयशी ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT