नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेतील थरारक आणि तणावपूर्ण शूट ऑफमध्ये पराभव पत्करावा लागल्याने मनू भाकर हिचे सुवर्णपदक अगदी थोडक्यात हुकले. ऑलिम्पिकमधील दुहेरी कांस्यपदक विजेती मनूला 25 मीटर पिस्तूल इव्हेंटमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर भारताचीच ईशा सिंग हिने कांस्यपदक पटकावले.
या स्पर्धेतील सर्वाधिक चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत, सुवर्णपदक विजेती गुयेन थुई ट्रांग, मनू यांनी अंतिम फेरीत प्रत्येकी 35 गुणांची समान कामगिरी केली. यानंतर शूटऑफमध्ये व्हिएतनामच्या नेमबाजाने बाजी मारली. निर्णायक लढतीत माजी आशियाई एअर पिस्तूल विजेती ट्रांग, मनू, ईशा आणि ऑलिम्पियन रिदम सांगवान हे सर्वच अव्वल स्थानासाठी जोरदार शर्यतीत होते.
पहिल्या फेरीत ईशाने परफेक्ट 5 गुण मिळवले, तर मनू आणि ट्रांग यांनी प्रत्येकी 4 गुण साधले. प्रत्येक फेरीनंतर तिन्ही भारतीय नेमबाज पदकांच्या स्थानांची अदलाबदल करत होते, मात्र सहाव्या फेरीत परफेक्ट 5 गुण मिळवत व्हिएतनामी खेळाडूने दोन गुणांची आघाडी घेतली. सातव्या फेरीत ट्रांगची कामगिरी खराब ठरली आणि तिने केवळ एकच लक्ष्य भेदले. याचा फायदा घेत मनू आणि ईशाने गुणांतील अंतर कमी केले. आठव्या फेरीअखेर 30 गुणांसह आघाडीवर असलेल्या ईशाला नवव्या फेरीत एकही लक्ष्य भेदता आले नाही आणि तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
अंतिम फेरीत मनूने 3 लक्ष्ये भेदली, तर ट्रांगने दोनच लक्ष्ये साधली. त्यामुळे दोघांचेही एकूण गुण 35 झाले आणि थरारक शूट ऑफ खेळवावा लागला. याआधी, ‘प्रिसिजन’ आणि ‘ड्युएलिंग’ या टप्प्यांचा समावेश असलेल्या पात्रता फेरीत ईशाने 589 गुणांसह अव्वल स्थान मिळवले, तर मनू 584 गुणांसह दुसर्या क्रमांकावर राहिली. तीन भारतीय नेमबाजांनी आठजणांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
25 मीटर पिस्तूल ज्युनिअर अंतिम फेरीत नाम्या कपूर हिने थरारक शूट ऑफमध्ये विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारी सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरलेल्या नाम्याने इंडोनेशियाच्या रिहादातुल अस्यिफासोबत नियोजित फेरीनंतर प्रत्येकी 29 गुणांची बरोबरी केली होती. मात्र शूट ऑफमध्ये तिने तीन लक्ष्ये भेदत संयम दाखवला, तर अस्यिफा एकही लक्ष्य भेदू शकली नाही. अंजली भागवत हिने 24 गुणांसह कांस्यपदक मिळवले. ज्युनिअर भारतीय संघानेही या प्रकारात सांघिक सुवर्णपदक पटकावले.