Coaching Staff Change: आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्ध भारतीय टी २० संघाचा दारूण पराभव झाला आहे. त्यानंतर आता भारताच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार हेड कोच गंभीरच्या सपोर्ट स्टाफमधील दोन सदस्यांवर टांगती तलावर आहे. यात एका वरिष्ठ सपोर्ट स्टाफ सदस्याची आयपीएलच्या एका फ्रेंचायजीसोबत चर्चा देखील सुरू आहे. ते या फ्रेंचायजीसोबत लवकरच जोडले जाऊ शकतात. अजून एक कोचिंग स्टाफ मेंबर भारतीय संघाची साथ सोडण्याची शक्यता आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ऑगस्टमध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यापूर्वी सध्याच्या कोचिंग स्टाफची समीक्षा करण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, झिम्बाब्वेविरूद्धच्या टी २० मालिका आणि एशियन गेम्स २०२६ साठी व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नेतृत्वात वेगळा कोचिंग स्टाफ नियुक्त करण्याचा निर्णय झाला आहे. यामुळं देखील अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
वृत्तानुसार गौतम गंभीरच्या सपोर्ट स्टाफ सोबत बीसीसीआयने २ अधिक १ असा तीन वर्षाचा करार केला होता. सुरूवातीची दोन वर्षे पूर्ण झाल्यावर कोच आणि इतर दोघांना एका वर्षाने करार वाढण्याचा पर्याय आहे. भारतीय संघ सध्या आयर्लंडविरूद्धच्या मालिकेत पराभव झाला आहे. इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत देखील भारत व्हाईट वॉशच्या उंबरठ्यावर आहे.
असं असलं तरी या कामगिरीचा आणि सपोर्ट स्टाफ बदलण्याचा थेट संबंध असल्याचे नाकारण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोचिंग स्टाफमध्ये अंतर्गत निर्माण झालेल्या मुद्द्यांमुळं हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बीसीसीआयने झिम्बाब्वेविरूद्धच्या टी २० मालिकेसाठी गंभीर आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला जबाबदारी दिलेली नाही. त्याच्या ऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मण या दौऱ्यावर हेड कोच असणार आहे. त्यानंतर जपानमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी देखील तेच सांभाळणार आहेत.
एका सूत्रानुसार, 'झिम्बाब्वे दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मणला का पाठवण्यात येणार आहे हे कळत नाही. त्यांना एशियन गेम्ससाठी पाठवणं देखील कल्पनेच्या पलिकडेचा निर्णय वाटतो. प्रकरण जेवढं वाटतं तितकं सोपं नाहीये. मला वाटतं की बीसीसीआय पर्यायाची चाचपणी करत आहे.
गौतम गंभीर २०२४ मध्ये भारतीय संघाचा हेड कोच झाला होता. त्यानंतर त्यानं असिस्टंट म्हणून रयान टेन डोशेट आणि फिल्डिंग कोच टी दिलीप सपोर्ट स्टाफ म्हणून जोडले गेले. त्यानंतर बांगलादेश दौऱ्यात मोर्नो मॉर्कल गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जॉईन झाले. गंभीरने अभिषेक नायर आणि सितांशु कोटक यांना देखील आपल्या सेटअपमध्ये आणलं होतं.
मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर नायार संघापासून वेगळा झाला आणि सितांशु कोटक यांनी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. नुकतेच बीसीसीआयने साईराज बहुतुलेला फिरकी कोच म्हणून देखील नियुक्त केलं आहे.