पुढारी ऑनलाईन डेस्क
टी-20 विश्वचषक जिंकल्याबद्दल कर्णधार रोहित शर्मा आणि संपूर्ण टीम इंडियाचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि सभागृहाने अभिनंदन केले. टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आणि तब्बल १७ वर्षांचा दुष्काळ संपवला.
हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलरचा सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर अत्यंत कलात्मक पद्धतीने घेतलेला झेल या विजयाचा टर्निंग पॉईंट ठरला. या झेलने सामन्याचा नूर पालटला अन् भारताने विश्वविजयाचा तिरंगा फडकावला. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात २००७ मध्ये भारताने पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता. पण त्यानंतर जवळपास १७ वर्षे भारताला सतत विश्वविजयाने हुलकावणी दिली होती. मात्र, हा दुष्काळ यंदा रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने संपवला.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० जून रोजी भारतीय क्रिकेट संघाशी फोनवर संवाद साधून T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते. पीएम मोदी यांनी संपूर्ण संघाचे अभिनंदन केले. रोहित शर्माच्या शानदार कर्णधारपदासाठी त्यांनी त्याचे अभिनंदन केले आणि त्याच्या टी-20 कारकिर्दीचेही कौतुक केले. विराट कोहलीच्या अंतिम सामन्यातील खेळी तसेच भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल पीएम मोदींनी त्याचे कौतुक केले होते.