Kranti Gaud INDW vs ENGW Test : इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात पाच बळी घेत 'लॉर्ड्स ऑनर्स बोर्ड'वर (सन्मान फलक) नाव नोंदवणारी पहिली महिला क्रिकेटपटू होण्याची ऐतिहासिक कामगिरी क्रांती गौडने केली आहे. क्रांतीने ३७ धावांत ५ बळी घेतल्यामुळे भारताने इंग्लंडला १७० धावांवर रोखले. पहिल्या डावात ११५ धावांची आघाडी मिळवली. भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी आपल्या दुसऱ्या डावात १ बाद १५४ धावा केल्या असून, एकूण २६९ धावांची आघाडी घेतली आहे.
लॉर्ड्स मैदानावर, पहिल्या पुरुष कसोटी सामन्यानंतर तब्बल १४२ वर्षांनी पहिला महिला कसोटी सामना खेळवला जात आहे. आपल्या नावावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद केल्यानंतर माध्यमांशी बोलताना क्रांती म्हणाली की, माझ्यासह माझ्या कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. माझ्यासाठी पूर्णपणे वेगळा आणि सुखावणारा अनुभव आहे. लॉर्ड्स ऑनर्स बोर्डवर नाव नोंदवणारी पहिली महिला बनल्याचा मला खूप अभिमान वाटत आहे. माझ्या कुटुंबासाठीही हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे."
"प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते की त्याने सामन्यात ५ बळी घ्यावेत. आम्ही पहिल्यांदाच लॉर्ड्सवर खेळत आहोत, त्यामुळे मी विचार करत होते की, जर मी ५ बळी घेण्यात यशस्वी झाले तर सन्मान फलकावर माझे नाव नोंदवले जाईल आणि यामुळे संघाला विजय मिळवून देण्यातही मदत होईल."
क्रांतीने लॉरेन बेलला बाद करून आपला पाचवा बळी घेतला, शेफाली वर्माने एक उत्कृष्ट झेल (कॅच) घेतला होता. यावर क्रांती म्हणाली, "जे काही होते ते चांगल्यासाठीच होते. आज मला आतून वाटत होते की मी ५ बळी घेईन. स्नेह राणाने झेल घेण्याचा खूप चांगला प्रयत्न केला होता. पण जेव्हा तिच्याकडून तो सुटला, तेव्हा शेफालीने तो अचूक टिपला. ५ बळी पूर्ण झाल्यामुळे मी सेलिब्रेशन करणारच होते, पण माझ्या सहकाऱ्यांनी मला थांबवले आणि रिप्ले व थर्ड अंपायरच्या निर्णयाची वाट पाहण्यास सांगितले."
"हा अनुभव खरोखरच खूप खास आहे. मी यापूर्वी एकदिवसीय सामन्यात ५ बळी घेतले आहेत, पण कसोटी सामन्यात असे करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. मला वाटते की मी यापेक्षाही चांगली कामगिरी करू शकते. इंग्लंडमधील खेळपट्ट्या (पिचेस) वेगवान गोलंदाजांसाठी पोषक आहेत आणि त्यामुळे मला खूप मदत झाली," असेही क्रांतीने सांगितले.