पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर मोठी विश्रांती घेतली होती. सध्या बांगलादेशी क्रिकेट संघ भारतीय दौऱ्यावर आहे. भारत आणि बांगलादेश यांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. यामध्ये चेन्नई येथील पहिला कसोटी जिंकून भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमधील दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. एकीकडे भारताची नजर हा सामना जिंकून मालिका काबीज करण्याकडे असेल, तर पाहुण्या संघाला कानपूर कसोटी कोणत्याही परिस्थितीत जिंकून मालिका बरोबरीत आणायची आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता पुढील सात दिवस कानपूरमध्ये हे शक्य दिसत नाही. कारण कानपूरमध्ये पुढील आठवड्यामध्ये पावसाचे सावट चिन्हे असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. (IND vs BAN )
जर आपण सामन्याच्या आधी दोन दिवसांबद्दल चर्चा केली तर, 25 आणि 26 सप्टेंबरबद्दल दोन्ही दिवशी तापमान 33-35 अंश असेल, तर सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडू शकतो. म्हणजे सामन्यापूर्वीच ढगाळ वातावरण असेल. त्यामुळे पाऊस झालाच तर त्याचा परिणाम मैदानावर पडू शकतो.
जर दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवसाबद्दल बोललो तर सकाळी ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. यासोबतच मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 28 आणि 29 सप्टेंबर रोजी अशीच पहिल्यादिवशी होती तशी राहील, तर 30 सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबर हा सामन्याचा शेवटचा दिवस असेल. या दिवशी सूर्य आपल्या शिखरावर असेल, म्हणजे दमट उष्णता असेल. या दिवशी पावसाचे सावट नसेल असे हवामान खात्याकडून माहिती मिळाली आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान रोहित ब्रिगेडलाही कानपूरमध्ये अनेक मोठे विक्रम करण्याची संधी आहे, ज्यामध्ये सांघिक आणि वैयक्तिक विक्रमांचा समावेश आहे. जर भारतीय संघाने दुसरा सामनादेखील जिंकला तर तो कसोटीसामन्यात सर्वात यशस्वी चौथा संघ बनू शकतो. वास्तविक, टीम इंडियाने आतापर्यंत 580 कसोटीपैकी 179 सामने जिंकले आहेत, दक्षिण आफ्रिकेनेही तितक्याच कसोटी जिंकल्या आहेत. कानपूर कसोटी जिंकली तर भारतीय संध दक्षिण आफ्रिकेला मागे टाकून आणखी एक विक्रम आपल्या नावे करेल.