स्पोर्ट्स

Jasprit Bumrah in 4th Test : संकटमोचक बुमराह ‘मँचेस्टर’च्या मैदानात! एकाच दगडात दोन शिकार, अक्रमचा ‘महाविक्रम’ निशाण्यावर

Jasprit Bumrah vs Akram record : बुमराहला 2 मोठे विक्रम आपल्या नावे करण्याची सुवर्णसंधी

रणजित गायकवाड

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुहेरी दुखापतींचा मोठा फटका बसला आहे. युवा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी गुडघ्याच्या दुखापतीमुळे मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे, तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आगामी मँचेस्टर कसोटीत खेळू शकणार नाही. 22 वर्षीय रेड्डीला सरावादरम्यान गुडघ्याच्या लिगामेंटला दुखापत झाली. त्याने आतापर्यंतच्या दौऱ्यातील तीनपैकी दोन कसोटी सामन्यांमध्ये सहभाग घेतला होता, मात्र आता तो मायदेशी परतणार आहे.

बीसीसीआयने अद्याप या दुखापतीबाबत अधिकृतपणे तपशीलवार माहिती दिलेली नाही. दुसरीकडे, अर्शदीप सिंगला नेट्समध्ये सराव करताना डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने त्याचे कसोटी पदार्पण पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. त्याच्या जागी उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज याला संघात स्थान देण्यात आले आहे.

या दोन प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे जसप्रीत बुमराहची भूमिका अधिकच महत्त्वपूर्ण बनली आहे. मालिकेच्या या टप्प्यावर बुमराहला विश्रांती देण्याचे नियोजित होते, परंतु आता संघाला त्याची नितांत गरज असून, तो चौथ्या कसोटीत भारतीय गोलंदाजीच्या आक्रमणाचे नेतृत्व करण्याची दाट शक्यता आहे.

इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर जसप्रीत बुमराह

या सामन्यात बुमराहला दोन मोठे विक्रम आपल्या नावे करण्याची सुवर्णसंधी आहे. जर तो मँचेस्टर कसोटीत खेळला आणि 5 बळी मिळवण्यात यशस्वी ठरला, तर तो इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक कसोटी बळी घेणारा आशियाई गोलंदाज ठरेल. सध्या या यादीत पाकिस्तानचे दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम 53 बळींसह अव्वल स्थानी आहेत, तर बुमराहने 11 कसोटी सामन्यांत 49 बळी घेतले आहेत.

  • वसीम अक्रम : 14 सामने : 53 बळी

  • इशांत शर्मा : 15 सामने : 51 बळी

  • जसप्रीत बुमराह : 11 सामने : 49 बळी

  • मोहम्मद आमिर : 12 सामने : 49 बळी

  • मुथय्या मुरलीधरन : 6 सामने : 48 बळी

इतकेच नव्हे, तर ‘सेना’ (SENA) देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) सर्वाधिक वेळा एका डावात 5 बळी घेणारा आशियाई गोलंदाज बनण्याची संधीही बुमराहकडे आहे. सध्या तो आणि वसीम अक्रम प्रत्येकी 11 वेळा हा पराक्रम करून बरोबरीत आहेत. जर बुमराहने आणखी एकदा 5 बळी घेण्याची कामगिरी केली, तर तो या यादीत अग्रस्थानी पोहोचेल.

‘सेना’ देशांमध्ये कसोटीच्या एका डावात 5 बळी घेणारे गोलंदाज

  • जसप्रीत बुमराह : 33 सामने : 11 वेळा 5 बळी

  • वसीम अक्रम : 32 सामने : 11 वेळा 5 बळी

  • मुथय्या मुरलीधरन : 23 सामने : 10 वेळा 5 बळी

चौथ्या कसोटीत बुमराह मैदानात उतरणार?

या मालिकेत बुमराह आतापर्यंत भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने लीड्स आणि लॉर्ड्स कसोटीत प्रत्येकी पाच बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला अक्षरशः जेरीस आणले होते. सद्यस्थिती पाहता, त्याला विश्रांतीतून परत बोलावले जाईल, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण संघाला वेगवान गोलंदाजी विभागात त्याच्या अनुभवाची आणि कौशल्याची नितांत आवश्यकता आहे.

दुखापतग्रस्त खेळाडूंची अनुपस्थिती आणि मालिकेत बरोबरी साधण्याची संधी पाहता, बुमराहचे मँचेस्टर कसोटीत खेळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. भारताच्या आशा त्याच्या कामगिरीवर अवलंबून असतील आणि त्याचबरोबर विक्रमांच्या पुस्तकात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरण्याची संधीही त्याच्यासमोर असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT