पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय खेळाडूंना जवळपास एक महिन्याची सुट्टी मिळाली आहे. यानंतर पुढील महिन्यात टीम इंडिया बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. मात्र, त्याआधीच रोहित सेनेला धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत (Jasprit Bumrah) एक मोठे अपडेट समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून विश्रांती दिली जाण्याची शक्यता असून तो थेट न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून संघात पुनरागमन करेल असा दावा करण्यात आला आहे.
बुमराह टी-20 विश्वचषकानंतर विश्रांतीवर आहे. तो टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावरही गेला नव्हता. आता त्याला पुढील महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पण, वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत बुमराह या मालिकेचा भाग असणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.
बुमराह (Jasprit Bumrah) न्यूझीलंडविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतून पुनरागमन करू शकतो. ही मालिका 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाईल. उभय संघांमधील पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून बेंगळुरूमध्ये, तर दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यात आणि तिसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
भारतीय संघ व्यवस्थापन वेगवान गोलंदाजी आक्रमणात अधिक विविधता आणण्यास उत्सुक आहे. त्यामुळे निवड समिती डावखुरा वेगवान गोलंदाज आणि स्विंग गोलंदाजांचा संघात समावेश करण्याचा विचार करत आहेत. अर्शदीप सिंग आणि खलील अहमद हे प्रमुख दावेदार आहेत. डावखुरा वेगवान गोलंदाजाच्या यादीत यश दयाल याचाही समावेश आहे.
दरम्यान, दुलीप ट्रॉफी 5 सप्टेंबरपासून बेंगळुरूमध्ये सुरू होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. पण शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांसारखे खेळाडू या स्पर्धेत आपली प्रतिभा दाखवतील. स्पर्धेत 4 संघ सहभागी होणार आहेत.