चेन्नई : आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) गोटात नेतृत्वावरून सुरू असलेल्या चर्चेत आता एका दिग्गज खेळाडूने उडी घेतली आहे. आयपीएलमध्ये जवळपास ५००० धावांचा टप्पा पार करणारे टीम इंडिया आणि सीएसकेचे माजी फलंदाज रॉबिन उथप्पा यांनी ऋतुराज गायकवाडचे समर्थन केले असून, संजू सॅमसनला कर्णधार करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे.
एका क्रीडा कार्यक्रमात बोलताना उथप्पा म्हणाला की, ऋतुराज गायकवाडला कर्णधार म्हणून स्थिर होण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. "मला वाटत नाही की सीएसकेने आत्ताच संजू सॅमसनकडे नेतृत्वाची धुरा सोपवावी. ऋतुराज २०२४ पासून संघाचे नेतृत्व करत आहे. तो हळूहळू महेंद्रसिंह धोनीच्या सावलीतून बाहेर पडत असून, त्याला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आणि क्षमता सिद्ध करण्यासाठी व्यवस्थापनाने पाठबळ दिले पाहिजे," असे स्पष्ट मत उथप्पाने व्यक्त केले.
आयपीएल २०२६ पूर्वी झालेल्या एका मोठ्या 'ट्रेड'मुळे संजू सॅमसन या हंगामात पहिल्यांदाच चेन्नईच्या पिवळ्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. संजूच्या आगमनामुळे तोच संघाचा नवा कर्णधार होणार, अशा चर्चांना उधाण आले होते; मात्र चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाडच कर्णधार पदी कायम राहील, असे स्पष्ट करून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
एमएस धोनीच्या भविष्याबाबत भाष्य करताना उथप्पा म्हणाला की, "मला वाटते की धोनीचा खेळाडू म्हणून हा शेवटचा आयपीएल हंगाम असेल. यावर्षी तो 'मेंटर' (मार्गदर्शक) आणि खेळाडू अशा दुहेरी भूमिकेत दिसेल. जेव्हा धोनी मैदानावर नसेल, तेव्हाच ऋतुराजच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागेल. ऋतुराजला अजून काही वर्षे संधी द्या, जर त्याने अपेक्षित यश मिळवून दिले नाही, तर संजू सॅमसनचा पर्याय तुमच्याकडे नेहमीच उपलब्ध आहे."