पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये यंदा स्पर्धेत नेहमीच बहुचर्चित राहणार चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings) संघाची पराभवाची मालिका रविवारी (दि.२०) कायम राहिली. मुंबईने चेन्नई संघावर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या पराभावामुळे 'सीएसके'च्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत (K Srikkanth) यांनी यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई संघाचा प्रवास जवळजवळ संपला असल्याचे म्हटलं आहे. तसेच यंदा कोणता संघ ट्रॉफी फटकावणार याचेही भाकित त्यांनी केले आहे. ( IPL 2025 )
श्रीकांत यांनी 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आयपीएल २०२५ हा हंगाम चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी जवळजवळ संपला आहे! रविवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने खूपच छान खेळ केला. या सामन्यात रोहित आणि सूर्या यांनी मैदानाच्या प्रत्येक भागात चेंडू टोलवताना पाहणे ही एक पर्वणी होती! आता चेन्नई संघाला उर्वरित सामन्यांमध्ये मोकळेपणाने खेळावे असा सल्ला आहे. मी यापूर्वीच सांगितले होते की, यंदाचे आयपीएल हे मुंबई इंडियन संघ जिंकेल.
यंदाच्या आयपीएलमध्ये आपले आव्हान जिंवत ठेवायचे असेल तर चेन्नई सुपर किंग्ज संघाला उर्वरित सहा सामन्यांपैकी किमान पाच सामने जिंकावे लागतील. सध्या गुणतालिकेत चेन्नई संघ तळाला आहे. तसेच गुणतालिकेतील वरच्या क्रमाकांवर असणार्या संघाची दमदार कामगिरी सुरु आहे. त्यामुळे पुढील सर्व सामाने जिंकताना चेन्नईला संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावे लागणार आहे. आता शुक्रवार, २५ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
रविवारी (दि. २० एप्रिल) वानखेडेवर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने ५ गडी गमावत १७६ धावांपर्यंत मजल मारली. 176 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा यांनी मुंबईला दमदार सुरुवात करुन दिली. पॉवर प्लेमध्ये 62 धावा फलकावर लागल्या. रिकेल्टन (24) बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव रोहितच्या जोडीला आला. दोघांनी आपल्या स्टाईलने खेळ केला. चेन्नईच्या कमकुवत गोलंदाजीचा दोघांनी अक्षरश: धुव्वा उडवला. रोहित शर्माने 33 चेंडूंत यंदाच्या आयपीएलमधील अर्धशतक गाठले. सूर्यानेही 26 चेंडूंत पन्नाशी पार केली. 51 चेंडूंत दोघांची शतकी भागीदारी झाली. मथिशा पथिरानाच्या षटकांत रोहितने एक आणि सूर्याने दोन षटकार ठोकून 15.4 षटकांत सामना संपवला.