एकीकडे, क्रिकेट झपाट्याने बदलत असताना या खेळातील गरजाही आमूलाग्रपणे बदलत आहेत. एकेकाळी बहरातील स्पिनर्स मॅचविनर मानले जायचे; पण इंग्लंड दौर्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत ज्याप्रमाणे कुलदीप यादवसारख्या अव्वल फिरकीपटूला पूर्ण वेळ राखीव खेळाडूंमध्ये बसून राहावे लागले, ते पाहता यापुढे भारतीय संघात स्पेशालिस्ट स्पिनर्सना कितपत स्थान असणार, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
वरुण चक्रवर्तीची रहस्यमय फिरकी शैली हे त्याचे बलस्थान होते. त्याची अपारंपरिक शैली, ही खासियत होती; पण फलंदाजीत तो कच्चा दुवाच असल्याने त्याच्या वाट्याला फक्त 4 वन-डे व 18 टी-20 सामने आले. तडाखेबंद पॉवर हिटर किंवा अगदीच गूढ फिरकीपटू असेल, तरच टी-20 संघात स्पेशालिस्ट म्हणून स्थान लाभते. चक्रवर्ती यात कशातच बसत नसल्याने आपसूकच मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला गेला.
2024 टी-20 वर्ल्डकपमध्ये अक्षर पटेल व रवींद्र जडेजा पहिल्या पसंतीचे फिरकीपटू होते. कुलदीपला प्रतिस्पर्धी आणि मैदान या निकषावर संधी देण्यात आली. त्यानंतर मार्चमधील ‘आयसीसी’ चॅम्पियन्स चषकात जडेजा व अक्षर पुन्हा पहिल्या पसंतीचे फिरकीपटू ठरले. भारताने तीन फिरकीपटू एकत्रित खेळवण्याचा निर्णय घेतला, त्याचवेळी कुलदीपला संधी मिळाली.
ज्याप्रमाणे कुलदीप यादवचे कसोटीतील स्थान धोक्यात आले, त्याचीच प्रचीती यापूर्वी युजवेंद्र चहलला टी-20 मध्ये आली आहे. वास्तविक, चहल हा ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज. त्याच्या खात्यावर 174 सामन्यांत 221 बळी; पण तरीही त्याला संघातून डच्चू मिळाला. त्याने ऑगस्ट 2023 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि त्यानंतर तो बाहेरच आहे. अशीच स्थिती अश्विनचीही असून, जडेजा लयीत असताना त्याला मुख्य प्रवाहातून बाहेर व्हावे लागले आहे.
स्पेशालिस्ट फिरकीपटूंचा रोल संपला, ही हाकाटी चुकीची आहे. कुलदीप संघात असता, तर आपण इंग्लंडमधील मालिका 3-1 फरकाने जिंकली असती. प्रशिक्षक गौतम गंभीर व कर्णधार शुभमन गिल यांना कुलदीपचे महत्त्व कळाले नाही, हे आपले दुर्दैव.माजी फिरकीपटू, मनिंदर सिंग
कुलदीपला फलंदाजी करता येत नाही, हे येथे महत्त्वाचे नाही; पण जे फिरकीपटू उत्तम गोलंदाजी करू शकतात, त्यांना फलंदाजी करणे क्रमप्राप्तच आहे, हे येथे अधिक महत्त्वाचे. यापुढील कालावधीत अष्टपैलूंना अधिक प्राधान्य मिळत राहील, हे साहजिकच.माजी क्रिकेटपटू, चंद्रकांत पंडित