स्पोर्ट्स

Chess World Cup in India : भारतात रंगणार 64 घरांचा जागतिक महासंग्राम! 2 दशकांनंतर मिळाले बुद्धिबळ विश्वचषकाचे यजमानपद

भारतीय भूमीवर 23 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा रंगणार बुद्धिबळ विश्वचषकातील 'शह-काटशह'चे डाव

रणजित गायकवाड

india will host this year chess world cup from october 30 to november27

भारतातील बुद्धिबळप्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. तब्बल 23 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, भारताला पुन्हा एकदा प्रतिष्ठित बुद्धिबळ विश्वचषक 2025 चे यजमानपद भूषवण्याचा मान मिळाला आहे. ही स्पर्धा येत्या 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाणार असून स्पर्धेच्या ठिकाणाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

बुद्धिबळाची जागतिक नियामक संस्था ‘फिडे’ (FIDE) ने मंगळवारी (21 जुलै) या वृत्ताला दुजोरा दिला. या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विश्वचषक स्पर्धेत जगभरातील 206 अव्वल खेळाडू सहभागी होतील. विजेतेपदाच्या लढाईसोबतच, हे खेळाडू 2026 मध्ये होणाऱ्या ‘फिडे कँडिडेट्स’ स्पर्धेतील स्थानासाठीही झुंज देतील.

यापूर्वी 2002 मध्ये झाले होते आयोजन

भारताने यापूर्वी 2002 साली हैदराबाद येथे या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. त्या स्पर्धेत भारताचे दिग्गज ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी विजेतेपद पटकावून इतिहास रचला होता. आता 23 वर्षांनंतर ही स्पर्धा पुन्हा एकदा भारतीय भूमीवर आयोजित होत आहे.

विश्वचषक 2025 चे आयोजन 'नॉकआऊट' पद्धतीने केले जाणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक फेरीत पराभूत होणारा खेळाडू स्पर्धेतून बाहेर होईल. फिडेच्या नियमांनुसार, स्पर्धेतील अव्वल तीन खेळाडू थेट 2026 च्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरतील, जी भविष्यातील विश्वविजेत्याच्या निवड प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते.

दिग्गज खेळाडू ठरणार आकर्षणाचे केंद्र

या भव्य स्पर्धेत भारताचे अनेक अव्वल खेळाडू सहभागी होणार असल्याने स्थानिक प्रेक्षकांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे. यामध्ये विद्यमान विश्वविजेता डी. गुकेश, विश्वचषक 2023 चा उपविजेता आर. प्रज्ञानानंद आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या 5 खेळाडूंमध्ये स्थान मिळवलेला अर्जुन एरिगैसी यांचा समावेश आहे. या खेळाडूंच्या उपस्थितीमुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढणार आहे.

या घोषणेवर प्रतिक्रिया देताना फिडेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एमिल सुतोव्स्की म्हणाले, ‘आम्ही भारतात विश्वचषक 2025 आयोजित करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत. भारत हा असा देश आहे, जिथे बुद्धिबळ केवळ एक खेळ नसून एक ध्यास आहे.’ या आयोजनामुळे देशातील उदयोन्मुख खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT