पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs ZIM 2nd T20 : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा टी-20 सामना रविवारी (दि. 7) हरारे येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाला पहिल्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. झिम्बाब्वेने आपल्या कामगिरीने सर्वांना चकित केले. त्यांनी युवा भारतीय संघाला लोटांगण घालण्यास भाग पाडले. टीम इंडियाच्या अशा पराभवानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पहिल्या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. कर्णधार शुभमन गिलशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. या कारणास्तव दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्येही काही बदल केले जाऊ शकतात.
टीम इंडियाच्या ओपनिंग जोडीमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कर्णधार शुभमन गिलच्या जोडीला अभिषेक शर्माच दिसेल. ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. मात्र, मधल्या फळीत ध्रुव जुरेलच्या जागी जागी जितेश शर्माला खेळवले जाऊ शकते. जुरेलने पहिल्या टी-20 सामन्यात 14 चेंडूत केवळ 6 धावा करता आल्या.
आवेश खान आणि खलील अहमद यांनाही गोलंदाजीत वगळले जाऊ शकते. हे दोन्ही गोलंदाज पहिल्या टी-20मध्ये तितका प्रभाव सोडू शकले नाहीत. आवेश खानने 4 षटकात 29 धावा देऊन केवळ 1 बळी घेतला तर दुसरीकडे खलील अहमदने 3 षटकात 28 धावा दिल्या आणि एकही बळी घेता आला नाही. खलील अहमद संपूर्ण सामन्यातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्यामुळे या दोन गोलंदाजांना वगळून हर्षित राणा आणि तुषार देशपांडे यांना खेळवले जाऊ शकते. एकूणच टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा, तुषार देशपांडे आणि मुकेश कुमार.