India Ireland T20
भारतीय क्रिकेट संघ जून २०२६ मध्ये आयर्लंडचा दौरा करणार असून दोन टी-२० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दुसरीकडे, आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने या मालिकेपूर्वीच कर्णधारपद सोडले आहे.
India Ireland T20
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी (२१ मार्च) भारतीय संघाच्या आयर्लंड दौऱ्याची अधिकृत घोषणा केली. जून महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंडमध्ये दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. विशेष म्हणजे, २००७ नंतर भारतीय संघ पहिल्यांदाच बेलफास्टमध्ये खेळताना दिसणार आहे.
भारत आणि आयर्लंडमधील दोन्ही T-20 स सामने बेलफास्ट येथे खेळवले जाणार आहे. पहिली टी-२०: २६ जून (भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता), दुसरी टी-२०: २८ जून (भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता) होणार आहे. भारतीय संघाने गेल्या आठ वर्षांत (२०१८, २०२२ आणि २०२३) तीन वेळा आयर्लंडचा दौरा केला आहे, मात्र बेलफास्टमध्ये १९ वर्षांनंतर हा पहिलाच दौरा असेल. या मालिकेनंतर १ ते १९ जुलै दरम्यान भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून तिथे ५ टी-२० आणि ३ वनडे सामने होणार आहेत.
या मालिकेच्या घोषणेसोबतच आयर्लंड क्रिकेटमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आयर्लंडचे 'डायरेक्टर ऑफ हाय परफॉर्मन्स' ग्रॅहम वेस्ट यांनी माहिती दिली की, स्टार खेळाडू पॉल स्टर्लिंगने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट यांच्या मते, आयर्लंडचा संघ २०२८ च्या टी-२० विश्वचषकासाठी आधीच पात्र ठरला आहे. त्यामुळे नवीन कर्णधाराला या मोठ्या स्पर्धेसाठी संघ तयार करण्याची आणि स्वतःची शैली विकसित करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने स्टर्लिंगने हा निर्णय घेतला आहे.
नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकातील आयर्लंडची कामगिरी निराशाजनक राहिली होती, जिथे त्यांना ४ पैकी केवळ १ सामना जिंकता आला होता.कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर पॉल स्टर्लिंग म्हणाला, "मी टी-२० चे कर्णधारपद सोडत असलो तरी आयर्लंड संघासाठी माझे योगदान सुरूच राहील. मी वनडे संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. एक खेळाडू म्हणून मला स्वतःच्या कामगिरीवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे, जेणेकरून मी संघासाठी सर्वोत्तम योगदान देऊ शकेन."