कोलंबो; वृत्तसंस्था : 15 फेब्रुवारीला होणाऱ्या भारत–पाकिस्तान सामन्यामुळे वातावरण तापलं आहे. कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे रंगणाऱ्या या लढतीसाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. एकमेकांचे कट्टर वैरी म्हणून पुरेपूर नावारूपास आलेले भारत-पाकिस्तानचे कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी आज कोलंबोत आमने-सामने भिडणार आहेत. या सामन्यात अनेक खेळाडूमध्ये जुगलबंदी रंगणार आहे. चला जाणून घेवूया...
गेल्या वेळी जेव्हा हे दोन खेळाडू भिडले होते, तेव्हा फरहानने बुमराहला एकाच षटकात दोन षटकार मारण्याचा पराक्रम केला होता, पण आता बुमराह पूर्ण लयीत आहे. पॉवर प्लेमध्ये बुमराहला गंभीर कसा वापरणार, हेही महत्त्वाचे!
टी-20 मध्ये कुलदीप व बाबर आझम एकदाही आमने-सामने आले नाहीत. मात्र, वन डेत कुलदीपने बाबरला 3 सामन्यांत 2 वेळा बाद केले आहे. कुलदीपला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले, तर बाबरची दांडी उडवण्यासाठी तो सज्ज असेल.
उस्मान तारीकची ‘स्टॉप अँड स्लिंग’अॅक्शन सध्या चर्चेत आहे, पण हार्दिक पंड्या असा फलंदाज आहे जो अशा प्रकारच्या गोलंदाजीची पिसे काढू शकतो. तारीकच्या संभ्रम निर्माण करणार्या शैलीला उत्तर देण्यासाठी हार्दिक महत्त्वाकांक्षी असेल.
इशान किशन सध्या करिअरच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. दुसरीकडे, शाहिन इशानच्या उंचीचा फायदा घेऊन ‘शॉर्ट पिच’ चेंडूंचा मारा करण्याची दाट शक्यता आहे. यामुळे, या उभयतांतही चांगलीच जुगलबंदी रंगू शकते.
फिरकीपटूंना फोडून काढण्यात शिवम दुबेचा हात कोणीच धरू शकत नाही. 2025 मध्ये फिरकीविरुद्ध त्याचा स्ट्राईक रेट 193 पेक्षा जास्त राहिला आहे. आज अबरार आणि शादाब या लेग स्पिनर्सना पल्लेदार षटकार खेचणे, हे शिवम दुबेचे लक्ष्य असेल.
या महामुकाबल्यासाठी पाकिस्तानचा संघ 2 जलदगती व 2 फिरकी अशा 4 स्पेशालिस्ट गोलंदाजांसह मैदानात उतरेल, असा दावा सूत्रांनी केला आहे. अबरार अहमद व उस्मान तारीक या स्पेशालिस्ट फिरकीपटू तर शाहिन शाह आफ्रिदी व सलमान मिर्झा या स्पेशालिस्ट स्पीडस्टार्सना प्रामुख्याने उतरवण्याचा मुख्य प्रशिक्षक माईक हेसन व कर्णधार सलमान अली आगा यांचा गेमप्लॅन असल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास शादाब खान, मोहम्मद नवाज व फहीम अश्रफ या तीनपैकी एका अष्टपैलूला देखील वगळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मैदानावरील गणितांचा विचार करता भारताची मदार इशान किशन, सूर्यकुमार, पंड्या, रिंकू आणि तिलक यांसारख्या स्फोटक फलंदाजांवर असेल. श्रीलंकेतील खेळपट्ट्या फिरकीला पूरक असल्याने वरुण चक्रवर्तीची भूमिका महत्त्वाची ठरेल, तर अर्शदीप आणि हार्दिकचा पाकिस्तानविरुद्धचा जुना मजबूत रेकॉर्ड भारतासाठी जमेची बाजू ठरणार आहे.