क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांचे वर्चस्व राहिले आहे. एकेकाळी जागतिक क्रिकेटवर ऑस्ट्रेलियन संघाचे एकछत्र राज्य होते, तर त्यांना कडवी झुंज देण्याची क्षमता केवळ भारतीय संघातच दिसून आली आहे. अलीकडच्या काळात टीम इंडियाने आयसीसी स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करत जेतेपदांची संख्या वाढवली असली, तरी ऑस्ट्रेलियाची बरोबरी करण्यासाठी भारताला अजून काही पावले टाकावी लागणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत किती आयसीसी चषक जिंकले आहेत, याचा सविस्तर आढावा घेऊया.
टी-२० विश्वचषक २०२६ चे जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघाच्या खात्यात सध्या एकूण ८ आयसीसी ट्रॉफी जमा झाल्य आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत १० वेळा आयसीसी चषकावर आपले नाव कोरले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन संघाची सध्याची खालावलेली कामगिरी आणि टीम इंडियाचा विजयरथ असाच सुरू राहिल्यास, आगामी दोन-तीन वर्षांत भारत ऑस्ट्रेलियाला मागे टाकू शकतो, यात शंका नाही.
विशेष म्हणजे, भारताने १९८३ मध्ये आपला पहिला विश्वचषक जिंकला होता, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या खात्यात एकही आयसीसी जेतेपद नव्हते. मात्र, त्यानंतरच्या काळात ऑस्ट्रेलियाने जोरदार मुसंडी मारली. १९८७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. त्यानंतर १९९९, २००३, २००७, २०१५ आणि २०२३ असे एकूण सहा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला. तर कांगारूंना २०२१ मध्ये केवळ एकदाच टी-२० विश्वचषकावर मोहोर उमटवता आली आहे.
ऑस्ट्रेलियाने केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येच नव्हे, तर कसोटीतही आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. २०२३ मध्ये त्यांनी 'जागतिक कसोटी अजिंक्यपद' (WTC) पटकावले. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्यांनी २००६ आणि २००९ असे सलग दोन वेळा विजय मिळवला आहे. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात एकूण १० आयसीसी ट्रॉफी आहेत.
भारताने १९८३ च्या ऐतिहासिक विजयानंतर २०११ मध्ये दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरले. टी-२० फॉरमॅटमध्ये भारताची कामगिरी अधिक सरस राहिली आहे. भारताने आतापर्यंत तीन वेळा (२००७, २०२४ आणि नुकताच २०२६) टी-२० विश्वचषक जिंकला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताचा दबदबा राहिला असून २००२, २०१३ आणि २०२५ मध्ये भारताने हे जेतेपद पटकावले आहे. भारतीय संघाने आतापर्यंत एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा सर्व प्रमुख स्पर्धा जिंकल्या असल्या, तरी 'जागतिक कसोटी अजिंक्यपद' (WTC) जिंकण्याचे स्वप्न मात्र अद्याप अपूर्ण आहे.