हैदराबाद : (पीटीआय) आधीच एफआयएच महिला हॉकी विश्वचषक 2026 साठी पात्रता मिळवलेल्या भारतीय महिला हॉकी संघाचे आता लक्ष्य पात्रता स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यावर आहे. त्या दिशेने पुढचे पाऊल टाकण्यासाठी भारताचा सामना शुक्रवारी उपांत्य फेरीत इटलीशी होणार आहे.
भारतीय महिला हॉकी संघाने ‘ब’ गटामध्ये तीन सामन्यांत सात गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले. स्कॉटलंडलाही सात गुण मिळाले, मात्र भारताचा गोल फरक चांगला असल्यामुळे तो दुसर्या स्थानावर राहिला. भारताने गट टप्प्यात दोन विजय आणि एक बरोबरी अशी कामगिरी केली. इटलीने ‘अ’ गटामध्ये एक विजय, एक बरोबरी आणि एक पराभव अशा कामगिरीसह चार गुण मिळवत दुसरे स्थान पटकावले.
भारताच्या आघाडीवर नवनीत कौर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ती सध्या स्पर्धेतील संयुक्त अव्वल गोलस्कोरर असून तिने चार गोल केले आहेत. वेल्सविरुद्धच्या शेवटच्या गट सामन्यात तिने शानदार हॅट्ट्रिक करून संघाला दमदार विजय मिळवून दिला. इटलीकडून फेडेरिका कार्टा ही प्रमुख आक्रमक खेळाडू ठरली आहे. तिने आतापर्यंत स्पर्धेत तीन गोल केले आहेत.
कागदावर आणि सध्याच्या फॉर्मनुसार भारताला इटलीवर विजय मिळविण्यासाठी फारसा अडथळा येणार नसल्याचे दिसते. 2012 पासून दोन्ही संघांमध्ये सात सामने झाले असून भारताने त्यापैकी पाच सामने जिंकले, इटलीने एक सामना जिंकला, तर एक सामना बरोबरीत संपला. एफआयएच महिला हॉकी विश्वचषक 2026 ही स्पर्धा पुरुष विश्वचषकासोबत 15 ते 30 ऑगस्टदरम्यान नेदरलँड आणि बेल्जियम येथे संयुक्तपणे आयोजित केली जाणार आहे.
स्पर्धा जिंकायची आहे : भारतीय प्रशिक्षक
भारताचे मुख्य प्रशिक्षक स्जोर्ड मारिज्ने यांनी स्पर्धेतील आतापर्यंतच्या यशाला महत्त्वाचा टप्पा म्हटले आहे. ते म्हणाले, की एफआयएच महिला हॉकी विश्वचषक 2026 साठी पात्रता मिळवणे हा संघासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. खेळाडूंनी स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गट टप्प्यात संघाने शिस्त, संयम आणि आक्रमक खेळ दाखवला आहे. मात्र, आमचा उद्देश केवळ पात्रता मिळवणे नाही. प्रत्येक सामन्यागणिक सुधारणा करत आम्हाला स्पर्धा जिंकायची आहे. मात्र त्यांनी इटलीला कमी लेखू नये, असा इशाराही दिला. इटली हा स्पर्धात्मक संघ आहे आणि त्यांनी या स्पर्धेत मजबूत संघांना अडचणीत टाकले आहे. आम्हाला आमची योजना योग्यरीत्या अमलात आणत त्याच ऊर्जा आणि आत्मविश्वासाने खेळायचे आहे, असे त्यांनी सांगितले.