साऊथहॅम्प्टन; वृत्तसंस्था : अष्टपैलू दीप्ती शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्ध पहिल्या महिला वन डे सामन्यात 4 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. इंग्लिश महिला संघाने निर्धारित 50 षटकांत 6 बाद 258 धावा जमवल्यानंतर प्रत्युत्तरात भारताने 6 बाद 262 धावांसह सहज बाजी मारली. या विजयासह भारताने आगामी विश्वचषकाची तयारी मोठ्या आत्मविश्वासाने सुरू केली आहे.
विजयासाठी 259 धावांचे आव्हान असताना दीप्तीने 64 चेंडूंत 3 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 62 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या लढतीत एकवेळ संघ 4 बाद 124 असा अडचणीत होता. त्याचवेळी तिने जेमिमाह रॉड्रिग्ज यांनी पाचव्या गड्यासाठी 90 धावांची निर्णायक भागीदारी रचून सामन्याचे चित्र पालटले. जेमिमाहचे अर्धशतक अवघ्या दोन धावांनी हुकले. तिने 54 चेंडूंत 48 धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकांमध्ये अमनजोत कौरने 14 चेंडूंत 20 धावांची फटकेबाजी करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
दीप्तीने लॉरेन बेलच्या गोलंदाजीवर मारलेला एकहाती षटकार या सामन्याचे वैशिष्ट्य ठरला. तिने ऑफ-स्टम्पच्या बाहेरचा चेंडू सहज उचलून डीप मिड-विकेटच्या दिशेने सीमापार धाडला. तत्पूर्वी, इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सोफिया डंकलेच्या 92 चेंडूंतील नाबाद 83 धावांच्या जोरावर 6 बाद 258 धावा केल्या होत्या. तिला अॅलाईस डेव्हिडसन-रिचर्डस्ने (53) उत्तम साथ दिली. भारताकडून क्रांती गौड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.