India vs Zimbabwe 3 Matches T20I Series
हरारे : आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अनपेक्षित पराभवाचे धक्के पचवल्यानंतर, आता भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत विजयाच्या ट्रॅकवर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. हरारे स्पोर्टस् क्लबवर आयोजित या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (दि. २३) सायंकाळी ४.३० पासून खेळवला जाईल.
कर्णधार म्हणून खेळलेल्या पहिल्या सात सामन्यांपैकी सहा सामने गमावल्यानंतर श्रेयस अय्यरसाठी ही मालिका स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्याची आणि ड्रेसिंग रूमचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्याची मोठी संधी असेल. अनुभवी संजू सॅमसनची या दौऱ्यासाठी निवड न झाल्यामुळे पंजाबचा धडाकेबाज फलंदाज अभिषेक शर्मा आणि अवघ्या १५ वर्षांचा डाव्या हाताचा युवा सनसनाटी फलंदाज वैभव सूर्यवंशी डावाची सुरुवात करतील हे आता स्पष्ट झाले आहे.
या दौऱ्यासाठी भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्याकडे हंगामी मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. आक्रमक आणि सातत्याने प्रयोग करणाऱ्या गंभीर यांच्या तुलनेत लक्ष्मण यांची कार्यशाली संयमावर भर देणारी आहे. लक्ष्मण सहसा अंतिम अकरा खेळाडूंमध्ये जास्त फेरबदल करत नाहीत. त्यामुळे या मालिकेसाठी संघात स्थैर्य राखत विजय मिळवून देणे, हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट असेल.
स्थळ : हरारे
सामन्याची वेळ : सायं. ४.३० वा.
थेट प्रेक्षपण : झी युनाईट-८ स्पोर्टस्