स्पोर्ट्स

IND vs SL Test : भारत श्रीलंकेविरुद्ध 3 डावखुरे फिरकीपटू खेळवणार, गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कलचे संकेत

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात रंगणार पहिली कसोटी

रणजित गायकवाड

गाल : श्रीलंकेविरुद्धच्या आगामी पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ तीन डावखुरे फिरकीपटू मैदानात उतरवण्याच्या रणनीतीवर विचार करत आहे. कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि युवा मानव सुथार या तिघांकडे असलेले वैविध्य आणि विकेट घेण्याची क्षमता पाहता, हा एक अत्यंत आक्रमक पर्याय ठरेल, असे संकेत भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल यांनी गुरुवारी दिले.

माध्यमांशी बोलताना मॉर्कल म्हणाले, ‘आमच्या फिरकी विभागात उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. कुलदीप यादवकडे त्याच्या रिस्ट-स्पिनची जादू आणि मोठा अनुभव आहे, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. दुसरीकडे, रवींद्र जडेजाची अचूकता जगातील सर्वोत्तम फलंदाजांनाही अडचणीत आणू शकते, तर मानव सुथार हा चेंडूला हवेत फ्लाईट देणारा पारंपरिक शैलीतील गोलंदाज आहे. हे तिन्ही फिरकीपटू वेगवेगळ्या शैलीचे असल्याने त्यांच्या एकाच वेळच्या समावेशाची आम्हाला अजिबात काळजी नाही.’

कशी असेल खेळपट्टी?

गाल येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजीसाठी चांगली वाटत असली, तरी सामना जसजसा पुढे जाईल, तसा ती फिरकीला साथ देईल, असा अंदाज मॉर्कल यांनी व्यक्त केला. ‘इथला इतिहास पाहता, सामन्याच्या उत्तरार्धात खेळपट्टी फिरकीला अनुकूल ठरते. अशा परिस्थितीत तीन फिरकीपटूंसह उतरणे हा प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणणारा मार्ग ठरेल. मात्र, सामन्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कर्णधार शुभमन गिल या तिघांचा वापर कसा करतो, यावर बरेच काही अवलंबून असेल,’ असेही ते म्हणाले.

दुसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध

वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणात अनुभवी मोहम्मद सिराजचे स्थान निश्चित असले, तरी दुसऱ्या वेगवान गोलंदाजासाठी भारताला निवड करावी लागणार आहे. यासाठी मर्यादित कसोटी अनुभव असलेले प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार हे शर्यतीत आहेत. उष्ण वातावरणाचे आव्हान

श्रीलंकेतील कडक ऊन आणि हवेतील आर्द्रता हे भारतीय गोलंदाजांसमोर सर्वात मोठे आव्हान असेल, असे मॉर्कल यांनी येथे नमूद केले. ‘येथील परिस्थितीत २५ ते ३० ओव्हर्सनंतर कुकाबुरा चेंडू मऊ पडतो. अशा वेळी वेगवान गोलंदाजांना अधिक हुशारीने क्रीजचा वापर करावा लागेल आणि अचूक शॉर्ट बॉल टाकावे लागतील. पूर्ण तीव्रतेने आणि एकाच टप्प्यावर सलग गोलंदाजी करणे ही गोलंदाजांची मानसिक कसोटी असेल,’ असे सांगत मॉर्कल यांनी गोलंदाजांच्या मानसिक तयारीवर भर दिला.

गॉलमध्ये एकत्रित १४५ बळी घेणार्‍या जयसूर्या-मेंडिसचेच मुख्‍य आव्‍हान

गाल स्‍टेडियमवर श्रीलंकेचे दोन अव्वल फिरकीपटू प्रबथ जयसूर्या आणि रमेश मेंडिस यांनी आजवर एकत्रित १४५ बळी घेतले आहेत. यात डावखुरा फिरकीपटू प्रबथ जयसूर्याने अवघ्या ११ कसोटी सामन्यांत ८१ बळी घेण्याचा पराक्रम केला तर ऑफ-स्पिनर रमेश मेंडिसने १२ सामन्यांत ६४ बळी मिळवून त्याला तोडीस तोड साथ दिली आहे. या मालिकेत भारतासमोर खरे आव्‍हान या जोडीचेच असेल.

भारत-श्रीलंका कसोटी मालिकेची रूपरेषा

  • १५ ते १९ ऑगस्‍ट : पहिली कसोटी : स. १० वा. : गॉल

  • २३ ते २७ ऑगस्‍ट : दुसरी कसोटी : स. १० वा. : कोलंबो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT