Ind vs Pak womens t20 world cup 2026 : महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज (दि. १४ जून) बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे. या हा हायव्होल्टेज मुकाबल्याद्वारे दोन्ही संघ विश्वचषक स्पर्धेला सुरुवात करतील. मात्र, सामन्यापूर्वी मैदानाबाहेरील एका चर्चेने क्रीडा जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन (Handshake) करणार का? यावर भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मौन सोडले असून थेट उत्तर दिले आहे.
राजकीय तणावामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय मालिका खेळवली गेलेली नाही. त्यामुळे हे दोन्ही संघ केवळ आयसीसी किंवा बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात. त्यातच पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावरही दोन्ही देशांतील अंतर वाढले आहे. गेल्या काही काळापासून दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करण्याचे टाळत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
भारतीय क्रिकेट संघाने पुरुष आशिया कप २०२५ पासून पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याची 'नो हँडशेक पॉलिसी' कायम ठेवल्याचे दिसते. हाच ट्रेंड 'रायझिंग स्टार्स आशिया कप' आणि 'Under-19 आशिया कप'मध्येही पाहायला मिळाला होता. इतकेच नाही तर अंडर-१९ वर्ल्ड कपमधील सामन्यादरम्यानही दोन्ही संघात हीच स्थिती होती. स्वतः हरमनप्रीत कौरने गेल्या वर्षी महिला वनडे वर्ल्ड कपदरम्यान पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिच्याशी हस्तांदोलन केले नव्हते.
आता टी-२० वर्ल्ड कपमधील सामन्यापूर्वी जेव्हा हरमनप्रीतला या 'हँडशेक' विवादावर प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तिने अत्यंत मोजक्या शब्दांत उत्तर दिले. हरमनप्रीत म्हणाली, "आम्ही येथे केवळ क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत. आम्ही (संघामध्ये) इतर कोणत्याही गोष्टीवर चर्चा करत नाही."
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी पाहिली तर भारतीय महिला संघाचे पारडे जड आहे. भारताचा पाकिस्तानविरुद्ध १३-३ असा शानदार रेकॉर्ड आहे, तर महिला टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत ६-२ ने पुढे आहे. असे असले तरी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेहमीच एक वेगळा दबाव असतो, हे हरमनप्रीतने प्रांजळपणे मान्य केले. दबावाबाबत बोलताना ती म्हणाली, "मी जेव्हापासून एक चाहती म्हणून क्रिकेट पाहत आले आहे, तेव्हापासून मला हा दबाव जाणवतोय. आता तर मी स्वतः खेळत असल्याने हा दबाव अधिक असतो. परंतु, आम्ही संघात एकमेकांना हेच सांगतो की, अशा सामन्यांचा दबाव घेण्यापेक्षा त्याचा आनंद घेत खेळणे कधीही उत्तम. शेवटी हा देखील एक खेळच आहे."
गेल्या वर्षी महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली होती. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करत यंदाच्या स्पर्धेत विजयी सुरुवात करण्याचा निर्धार हरमनप्रीतने व्यक्त केला आहे. "पहिला सामना नेहमीच संपूर्ण स्पर्धेची दिशा ठरवत असतो. आम्ही सर्वजण या सामन्यासाठी उत्सुक आहोत. गेल्या वनडे वर्ल्ड कपसारखाच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही मैदानात उतरू," असा विश्वास तिने शेवटी व्यक्त केला.