IND vs PAK June 14 Match Where to Watch the High Voltage Clash
लंडन : क्रिकेट जगतातील सर्वात कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणारे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आमनेसाने येण्यासाठी सज्ज झाले आहेत. या महामुकाबल्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचाच कालावधी शिल्लक राहिला आहे. आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही संघ आमनेसामने येणार असून या बहुप्रतिक्षित स्पर्धेची रणधुमाळी लवकरच सुरू होत आहे. दोन्ही संघांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सध्या मैदानी रणनीती आखण्यावर भर दिला जात आहे.
आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार यंदा इंग्लंडच्या भूमीवर रंगणार असून १२ जूनपासून या स्पर्धेला दिमाखात सुरुवात होईल. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी यजमान इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात सलामीचा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय महिला संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात १४ जून रोजी पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्याने करेल.
विशेष म्हणजे या दिवशी रविवार असल्याने जगभरातील क्रिकेट चाहत्यांना या महामुकाबल्याचा आनंद घेता येईल. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होईल. १२ जून रोजी सुरू होणारा ही प्रतिष्ठेची स्पर्धा ५ जुलैपर्यंत चालणार आहे.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा ज्या गटामध्ये समावेश करण्यात आला आहे, त्यात पाकिस्तानव्यतिरिक्त नेदरलँड्स, द. आफ्रिका, बांगलादेश आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलिया या संघांचा समावेश आहे. भारतासाठी पाकिस्तानविरुद्धचे आव्हान तुलनेने सोपे मानले जात असले, तरी द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध भारतीय संघाला अत्यंत चुरशीच्या लढतीचा सामना करावा लागणार आहे.
महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानच्या महिला संघाला अद्याप एकदाही भारतीय संघाचा पराभव करता आलेला नाही. हा भारताचा एक ऐतिहासिक आणि दबदबा निर्माण करणारा विक्रम असून, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया हा धमाकेदार विजयी प्रवास पुढेही कायम ठेवण्यासाठी उत्सुक आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाला आतापर्यंत एकदाही महिला टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली यंदा इंग्लंडमध्ये इतिहास रचण्याच्या इराद्यानेच भारतीय संघ मैदानात उतरेल. काही महिन्यांपूर्वीच भारतीय महिला संघाने एकदिवसीय (ODI) विश्वचषकाचे विजेतेपद पटकावून इतिहास घडवला होता, ज्यामुळे देशातील क्रीडाप्रेमींच्या आशा आणि अपेक्षा कमालीच्या उंचावल्या आहेत.
दरम्यान, टी-२० विश्वचसक स्पर्धेपूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली गेली होती, ज्यामध्ये भारताला १-२ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवातून धडा घेत आता भारतीय संघ या मुख्य आयसीसी स्पर्धेत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्री चरणी, यास्तिका भाटिया, नंदिनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, राधा यादव.