पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs NZ Pune Test : गेल्या काही दिवसांपासून केएल राहुलवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याला टीम इंडियातूनही वगळण्याची मागणी होत आहे. बांगलादेश मालिकेत राहुलला कसोटी संघात संधी मिळाली आणि आता तो न्यूझीलंड मालिकेचाही एक भाग आहे. न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीत भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आणि या सामन्यात राहुलने केवळ 12 धावा केल्या आणि पहिल्या डावात त्याला आपले खातेही उघडता आले नाही. याच कारणामुळे शुभमन गिलच्या पुनरागमनानंतर केएल राहुलला पुणे कसोटीतून वगळले जाऊ शकते आणि शतक झळकावणाऱ्या सरफराज खानलाही कायम ठेवले जाईल, अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. मात्र, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी राहुलचा बचाव केला आहे.
पुणे कसोटीपूर्वी बुधवारी (दि. 23) झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सहभागी झाले होते. यादरम्यान त्यांना केएल राहुलबद्दल प्रश्न विचारण्यात त्यावर गंभीर यांनी कानपूर कसोटीत राहुलने खेळलेल्या खेळीचा उल्लेख केला. तसेच संघ व्यवस्थापन त्याच्या पाठीशी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘सोशल मीडिया प्लेइंग 11 ठरवत नाही. सोशल मीडिया किंवा तज्ज्ञ काय विचार करतात हे महत्त्वाचे नाही. संघ व्यवस्थापन काय ठरवते हे महत्त्वाचे आहे. राहुलने बांगलादेशविरुद्ध कानपूरच्या कठीण खेळपट्टीवर चांगली खेळी खेळली. न्यूझीलंडविरुद्ध बेंगलुरू कसोटीत राहुल अपयशी ठरला. पण पुणे कसोटीत त्याला मोठी धावसंख्या करायला आवडेल. तो नक्कीच यात यशस्वी होईल. व्यवस्थापनचा त्याला पाठिंबा आहे.’
राहुलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 86 धावांची इनिंग खेळली होती आणि काही डावात तो फ्लॉप झाला होता. त्याचवेळी चेन्नई कसोटीतही त्याला फारसे यश दाखवता आले नाही. मात्र, कानपूरमध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध 43 चेंडूत 68 धावांची जलद खेळी खेळली. अशा स्थितीत गंभीरने ज्या प्रकारचे विधान केले आहे, त्यावरून राहुलला आणखी एक संधी मिळेल असे वाटते. असे झाले तर शुभमन गिल कोणाची जागा घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.