भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेच्या निर्णायक सामन्यात पाहुण्या किवी संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांमध्ये ८ बाद ३३७ धावांचा विशाल डोंगर उभा केला. सुरुवातीच्या पडझडीनंतर डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी रचलेल्या ऐतिहासिक भागीदारीमुळे भारतासमोर आता विजयासाठी खडतर आव्हान असणार आहे.
भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात हेन्री निकोल्सला बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले. पाठोपाठ दुसऱ्या षटकात हर्षित राणाने डेव्हन कॉनवेचा बळी घेत न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलले. या मालिकेत हर्षितने सलग तिसऱ्यांदा कॉनवेला तंबूत धाडण्याची किमया साधली.
विल यंग आणि डॅरिल मिचेल यांनी ५३ धावांची भागीदारी रचून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मिचेल केवळ १ धावेवर असताना कुलदीप यादवने धावबाद करण्याची सोपी संधी गमावली. हे जीवदान भारताला चांगलेच महागात पडले. हर्षित राणाने विल यंगला बाद करून ही जोडी फोडली असली, तरी त्यानंतर मैदानावर 'मिचेल-फिलिप्स' वादळ घोंघावू लागले.
ग्लेन फिलिप्सला सुरुवातीला सूर गवसण्यासाठी वेळ लागला; त्याला पहिला चौकार मारण्यासाठी ३७ चेंडू वाट पाहावी लागली. मात्र, दुसऱ्या टोकाला डॅरिल मिचेलने आपला शानदार फॉर्म कायम राखत भारताची डोकेदुखी वाढवली. मिचेलने भारता विरुद्धचे चौथे एकदिवसीय शतक झळकावले, तर फिलिप्सने नंतर गिअर बदलत अवघ्या ८३ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. या दोघांच्या २१९ धावांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंड ३५० धावांच्या पार जाईल असे वाटत होते.
डावाच्या उत्तरार्धात भारतीय गोलंदाजांनी संयम राखला. अवघ्या ७ चेंडूंच्या अंतरात दोन्ही शतकी फलंदाजांना बाद करून भारताने धावगतीला वेसण घातली. शेवटच्या काही षटकांत कर्णधार मायकेल ब्रेसवेलने छोटी पण वेगवान खेळी करत संघाला ३३७ धावांपर्यंत मजल मारून दिली.
डेथ ओव्हर्समध्ये आपली छाप पाडत युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने पुन्हा एकदा आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले आहे. न्यूझीलंडच्या डावातील ४९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हर्षितने क्रिस्टियन क्लार्कला क्लिन बोल्ड करत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
हर्षितने टाकलेल्या या चेंडूवर फलंदाज क्लार्कने 'स्कूप' शॉट मारण्यासाठी यष्टीच्या बराच बाहेर सरकण्याचा प्रयत्न केला. मात्र, हर्षितने त्याची ही चाल ओळखली आणि अत्यंत चपळाईने पूर्ण लांबीचा वेगवान चेंडू थेट यष्टींच्या रोखाने टाकला. क्लार्क चेंडूचा वेग आणि दिशा ओळखण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आणि चेंडूने त्याच्या यष्टींचा वेध घेतला.
क्लार्क ५ चेंडूंत ११ धावा करून माघारी परतला. हर्षित राणाने या विकेटसह सिद्ध केले की, कठीण प्रसंगातही तो अचूक गोलंदाजी करू शकतो. या विकेटमुळे न्यूझीलंडला शेवटच्या षटकात अधिक धावा कुटण्यापासून भारताने यशस्वीपणे रोखले आहे.
डेथ ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या धावगतीला वेसण घालण्याचे काम सुरूच ठेवले आहे. अर्शदीप सिंगने आपल्या अनुभवाचा वापर करत झॅकरी फॉल्क्सला बाद करून न्यूझीलंडला सातवा झटका दिला. पुन्हा एकदा अर्शदीप आणि कुलदीप या जोडीने मैदानावर आपली छाप पाडली.
४८ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अर्शदीपने एक 'लो फुल टॉस' टाकला. फलंदाज फॉल्क्सने काहीतरी वेगळं करण्याच्या नादात आपली पोझिशन बदलली आणि 'रिव्हर्स स्कूप' मारण्याचा प्रयत्न केला. त्याने बॅटचा चेहरा उघडला खरा, पण चेंडूला हवी तशी उंची देऊ शकला नाही.
कुलदीपची चपळाई: बॅटला लागलेला चेंडू थेट 'शॉर्ट थर्ड मॅन'ला उभ्या असलेल्या कुलदीप यादवकडे गेला. कुलदीपने कोणताही विचार न करता चपळाईने खाली झुकत हा झेल पूर्ण केला. फॉल्क्स १० धावा करून बाद झाल्याने न्यूझीलंडची मोठी धावसंख्या उभारण्याची स्वप्ने आता धुळीस मिळताना दिसत आहेत.
भारताची सामन्यावर पकड: एकवेळ ३७०-३८० धावांच्या दिशेने जाणारा न्यूझीलंडचा संघ आता ३५० पर्यंत पोहोचण्यासाठीही संघर्ष करत आहे. अर्शदीप सिंगने मोक्याच्या क्षणी बळी मिळवून भारताला सामन्यात वरचढ स्थान मिळवून दिले आहे.
डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स बाद झाल्यानंतर भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवने न्यूझीलंडच्या उरल्यासुरल्या आशांना सुरुंग लावला आहे. कुलदीपने आपल्या जादुई चेंडूवर मिचेल हेला (Mitchell Hay) पायचीत करत किवींचा आणखी एक गडी बाद केला.
४६ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कुलदीपने ८४.६ किमी प्रतितास वेगाने एक शानदार 'गुगली' टाकला. मिचेल हेने धाडस करून 'रिव्हर्स स्वीप' मारण्याचा प्रयत्न केला, पण कुलदीपच्या चेंडूने त्याला पूर्णपणे चकवले. चेंडू थेट त्याच्या पॅड्सवर आदळला आणि अंपायर के.एन. अनंतपद्मनाभन यांनी उशीर न लावता बोट आकाशाकडे उंचावले.
मैदानावरील अंपायरच्या निर्णयाला मिचेल हेने आपल्या कर्णधाराशी चर्चा करून आव्हान दिले. मात्र, 'अल्ट्रा एज'मध्ये चेंडू बॅटला लागला नसल्याचे स्पष्ट झाले आणि 'बॉल ट्रॅकिंग'मध्ये चेंडू थेट ऑफ-स्टंपला धडकत असल्याचे दिसून आले. तिन्ही लाल दिवे लागताच न्यूझीलंडला आपला विकेटसोबतच एक 'रिव्ह्यू'देखील गमवावा लागला.
सुरुवातीच्या षटकांत महागात पडलेल्या कुलदीप यादवने मोक्याच्या क्षणी दोन बळी मिळवून भारताचे सामन्यातील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले आहे. एका पाठोपाठ एक धक्के बसल्याने न्यूझीलंडची धावगती आता मंदावली आहे.
किवींच्या फलंदाजीचा मुख्य कणा असलेल्या डॅरिल मिचेलला अखेर तंबूत धाडण्यात भारतीय संघाला यश आले. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या अनुभवाचा वापर करत मिचेलला चकवले, तर कुलदीप यादवने डोळ्यांवर येणाऱ्या कडक उन्हाची तमा न बाळगता एक कठीण झेल पूर्ण केला. यासह मिचेलची १३७ धावांची महाकाय खेळी संपुष्टात आली आहे.
४५ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सिराजने १२१.३ किमी वेगाने 'स्लोअर वन' (ऑफ-कटर) टाकला. मिचेलने त्यावर जोरदार 'पुल' मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूचा वेग कमी असल्याने तो बॅटच्या वरच्या कडेला लागून हवेत उंच उडाला.
चेंडू हवेत असताना 'डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग'वरून कुलदीप यादव धावत आला. भर दुपारी थेट डोळ्यांवर येणारे ऊन झेल टिपताना मोठे आव्हान होते. मात्र, कुलदीपने चेंडूवरची नजर हटवली नाही आणि खाली वाकत अत्यंत संयमाने हा झेल टिपला. मिचेलने १३१ चेंडूंत १५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १३७ धावांची जबरदस्त खेळी केली.
फिलिप्सपाठोपाठ मिचेलही बाद झाल्याने भारतीय गोलंदाजांनी सामन्यात जोरदार पुनरागमन केले आहे. एका वेळी ३७० धावांकडे झुकणारा न्यूझीलंडचा संघ आता या दोन मोठ्या विकेट्सनंतर दबावाखाली आला आहे. आता भारतीय गोलंदाज किवींचा डाव किती धावांवर रोखतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मैदानावर भारतीय गोलंदाजांची अक्षरशः परीक्षा घेणारी २१९ धावांची महाकाय भागीदारी अखेर संपुष्टात आली. टीम इंडियाचा 'डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट' अर्शदीप सिंगने धोकादायक ठरणाऱ्या ग्लेन फिलिप्सला बाद करून भारताला खूप मोठा दिलासा मिळवून दिला. १०६ धावांची तुफानी खेळी करून फिलिप्स माघारी परतला असून, भारतीय गोटात आता विजयाची आशा पुन्हा पल्लवित झाली आहे.
४४ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अर्शदीपने १३०.६ किमी वेगाने 'ऑफ-कटर' टाकला. चेंडू ऑफ-स्टंपच्या बाहेर होता. शतकी जोशात असलेल्या फिलिप्सने त्यावर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अर्शदीपच्या चेंडूने त्याला चकवले आणि बॅटची जाड कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे गेला. के.एल. राहुलने आपल्या उजव्या बाजूला सरकत अतिशय चपळाईने हा झेल टिपला आणि फिलिप्सचा अडथळा दूर केला.
ग्लेन फिलिप्सने अवघ्या ८८ चेंडूंत १०६ धावांची स्फोटक खेळी केली, ज्यात ९ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. मिचेल आणि फिलिप्स यांनी मिळून भारतीय गोलंदाजीचे वाभाडे काढत २१९ धावांची भागीदारी रचली होती. ही भागीदारी भारतासाठी डोकेदुखी ठरत असतानाच अर्शदीपने आपल्या अनुभवाचा वापर करून भारताला सामन्यात परत आणले आहे.
भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या वरच्या फळीला खिंडार पाडले असले, तरी डॅरिल मिचेलने मात्र आपला 'जबरा फॉर्म' कायम राखत टीम इंडियाच्या अडचणी वाढवल्या आहेत. २१ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक नजाकतदार चौकार खेचत मिचेलने आपले अर्धशतक पूर्ण केले.
फिरकीपटू कुलदीप यादवने २१ व्या षटकाचा शेवटचा चेंडू ८७.३ किमी वेगाने टाकला, मात्र त्याचा टप्पा चुकला. लेगब्रेकच्या प्रयत्नात चेंडू थेट मिचेलच्या पॅड्सवर पडला. मिचेलने या संधीचा पुरेपूर फायदा घेत चेंडूला अत्यंत हलक्या हाताने 'ग्लान्स' केले. शॉट इतका अचूक होता की शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला त्याला रोखण्याची साधी संधीही मिळाली नाही.
या चौकारासह मिचेलने या मालिकेतील आपले सातत्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. एका बाजूने गडी बाद होत असताना मिचेलने खिंड लढवत आपले अर्धशतक झळकावले. न्यूझीलंडला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यासाठी मिचेल सध्या भारतीय फिरकीपटूंसाठी सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. आता कुलदीप किंवा जडेजा या 'मिस्टर कन्सिस्टंट'ला लवकर बाद करून भारताला पुनरागमन करून देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
किवी फलंदाज डॅरिल मिचेल आणि विल यंग यांची जोडी जमतेय असे वाटत असतानाच, हर्षित राणा आणि रवींद्र जडेजाने मिळून न्यूझीलंडला तिसरा मोठा धक्का दिला. सेट झालेल्या विल यंगला (३० धावा) बाद करून भारताने ही महत्त्वाची भागीदारी तोडण्यात यश मिळवले आहे.
१३ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हर्षितने ऑफ-स्टंपच्या बराच बाहेर 'शॉर्ट पिच' चेंडू टाकला. विल यंगने त्यावर जोरदार 'कट' मारला. चेंडू हवेत होता आणि बॅकवर्ड पॉईंटला उभ्या असलेल्या रवींद्र जडेजाच्या आवाक्यात होता. जडेजाने आपल्या उजव्या बाजूला विजेच्या वेगाने डाईव्ह मारली आणि एक कठीण झेल दोन्ही हातांनी अलगद टिपला. हा झेल इतका वेगवान होता की दुसऱ्या कोणत्याही क्षेत्ररक्षकाला तो टिपणे अशक्य झाले असते, पण जडेजाने ते पुन्हा एकदा सहज करून दाखवले.
विल यंग ३० धावांवर खेळत असताना बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार लगावत भारतीय गोलंदाजांना सतावण्यास सुरुवात केली होती. मात्र, हर्षित राणाच्या हुशारीने आणि जडेजाच्या चपळाईने न्यूझीलंडचा जम बसू पाहणारा डाव पुन्हा एकदा विखुरला आहे. या विकेटसह हर्षित राणाने सामन्यातील आपला दुसरा बळी टिपला.
अर्शदीप सिंगने दिलेल्या धक्क्यानंतर युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने सामन्याच्या दुस-याच षटकात न्यूझीलंडला दुसरा मोठा झटका दिला. हर्षितने डेव्हन कॉनवेला अवघ्या ५ धावांवर बाद करत भारताला स्वप्नवत सुरुवात करून दिली. विशेष म्हणजे, या संपूर्ण मालिकेत हर्षितने तिन्ही सामन्यांत कॉनवेला बाद करण्याची किमया साधली आहे.
दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर (१.१ ओव्हर) हर्षितने 'बॅक ऑफ लेंथ' टप्प्यावर चेंडू टाकला. हा चेंडू ऑफ-स्टंपच्या रेषेतून किंचित सरळ राहिला. चेंडू सोडावा की खेळावा, या संभ्रमात कॉनवेने अर्धवट मनाने बॅट पुढे केली. चेंडूने बॅटच्या खांद्याचा वेध घेतला आणि तो थेट पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हातात स्थिरावला.
३-० या मालिकेत हर्षित राणा हा कॉनवेसाठी 'काळ' ठरला आहे. तिन्ही सामन्यांत एकाच गोलंदाजाकडून बाद होण्याची नामुष्की कॉनवेवर ओढवली. अवघ्या दोन षटकांत दोन्ही सलामीवीर बाद झाल्यामुळे न्यूझीलंडचा संघ बॅकफूटवर गेला. भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर आपली पकड घट्ट केली आहे.
इंदूरच्या मैदानावर सामना सुरू होऊन अवघी काही सेकंद उलटली असतानाच, भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने न्यूझीलंडला असा काही धक्का दिला की किवी संघाचे पाय लटपटू लागले आहेत. डावातील पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर अर्शदीपने सलामीवीर हेन्री निकोल्सचा त्रिफळा उडवून त्याला 'गोल्डन डक'वर माघारी धाडले.
अर्शदीपने टाकलेला तो चेंडू 'गुड लेंथ'वर पडून किंचित बाहेरच्या बाजूला वळत होता. चेंडूचा टप्पा आणि दिशा पाहून निकोल्स पूर्णपणे संभ्रमात पडला. चेंडू खेळावा की सोडावा, या द्विधा मनस्थितीत त्याने शेवटच्या क्षणी बॅट मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. चेंडू त्याच्या बॅटची आतील कडा घेऊन थेट स्टंपवर आदळला.
पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने निकोल्सला काय झाले हे समजायच्या आतच अर्शदीपने आपल्या खास शैलीत जल्लोष साजरा केला. या विकेटमुळे भारताने सामन्याच्या सुरुवातीलाच आपले वर्चस्व निर्माण केले असून इंदूरच्या मैदानात न्यूझीलंडची दाणादाण उडवली आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, आयुष बदोनी, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल.
न्यूझीलंड संघ : डेव्हन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झाकरी फाउल्क्स, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन, जेडेन लेनॉक्स, निक केली, आदित्य अशोक, जोश क्लार्कसन, मायकेल रे.
निर्णायक सामन्यासाठी इंदूर हे भारतासाठी अत्यंत सकारात्मक ठिकाण मानले जाते. या मैदानावर भारताने आतापर्यंत खेळलेले सर्व ७ एकदिवसीय सामने जिंकले असून आपला अपराजित विक्रम कायम राखला आहे. आजच्या सामन्यात भारतीय फिरकीपटूंना विशेषतः कुलदीप यादवला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून मिचेल आणि ब्रेसवेलसारख्या आक्रमक फलंदाजांना रोखण्याचे मोठे आव्हान असेल.
या मालिकेची सुरुवात वडोदरा येथील पहिल्या सामन्यात भारताच्या विजयाने झाली होती. विराट कोहलीच्या शानदार ९३ धावांच्या जोडीला सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने ३०१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग एका षटकाचा खेळ शिल्लक असताना यशस्वीपणे पूर्ण केला होता. मात्र, राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने जोरदार पुनरागमन केले. डॅरिल मिचेलने ११७ चेंडूंत नाबाद १३१ धावांची वादळी खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आणि मालिकेत बरोबरी साधली.
भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी उत्कृष्ट ताळमेळ राखत न्यूझीलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. पहिल्या दोन सामन्यांत संधी न मिळालेल्या अर्शदीप सिंगने पुनरागमन करताच आपल्या पहिल्याच षटकात हेन्री निकोल्सला शून्यावर बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले. दुसऱ्या बाजूने हर्षित राणाने डेव्हन कॉनवेला (५) स्वस्तात बाद करत किवी संघाला बॅकफूटवर ढकलले. हर्षितने त्यानंतर धोकादायक ठरू शकणारी डॅरिल मिचेल आणि विल यंग (३०) यांची जोडी फोडून भारताला सामन्यात वरचढ स्थान मिळवून दिले. मोहम्मद सिराजने या जोडीला साथ देत दबावाची रणनीती कायम ठेवली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील १-१ अशा बरोबरीनंतर, आजचा सामना उभय संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत न्यूझीलंडला सुरुवातीलाच धक्के दिले.