मुंबई : आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर महामुकाबला रंगणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंग याने भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माला एक मोलाचा आणि हटके सल्ला दिला आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत सध्या अग्रस्थानी असलेल्या अभिषेक शर्मासाठी हा विश्वचषक आतापर्यंत फारसा सुखावह राहिलेला नाही. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या डावखुऱ्या फलंदाजाने गेल्या सहा डावांत केवळ ८० धावा केल्या आहेत. यात सलग तीन वेळा तो शून्यावर बाद झाला आहे. पॉवरप्लेमध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडणाऱ्या अभिषेकच्या या खराब फॉर्ममुळे चाहत्यांमध्ये आणि क्रिकेट तज्ज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मात्र, पाँटिंगच्या मते, अशा परिस्थितीत अधिक सराव करण्यापेक्षा 'कमी सराव' करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. नेटमध्ये तासनतास फलंदाजी करून स्वतःला थकवण्यापेक्षा मानसिक विश्रांती घेणे गरजेचे असल्याचे पाँटिंगने सुचवले आहे.
‘आयसीसी रिव्ह्यू’मध्ये बोलताना पाँटिंग म्हणाला, ‘जेव्हा तुम्ही अशा खराब फॉर्ममधून जात असता, तेव्हा दररोज नेटमध्ये दीड-दोन तास फलंदाजी करणे हाच एकमेव उपाय नसतो. कधीकधी खेळाडूंनी क्रिकेटपासून दोन दिवस लांब राहून स्वतःला मानसिकदृष्ट्या ताजेतवाने करणे अधिक चांगले असते. तुमचे फलंदाजीचे कौशल्य कुठेही जात नाही, ते तुमच्याकडेच असते.’
पाँटिंगने पुढे असेही सुचवले की, ‘अभिषेकने फलंदाजीच्या सरावापासून स्वतःला थोडे दूर ठेवल्यास त्याला आपली लय पुन्हा सापडू शकते. त्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात अभिषेककडून मोठ्या खेळीची अपेक्षा व्यक्त केली आहे.’
पाँटिंग पुढे म्हणाला, ‘अशा मोठ्या स्पर्धेत तुमच्यावर सतत दडपण असते आणि निकाल तुमच्या बाजूने लागत नसतात. अशा वेळी आपली बॅग ‘बंद’ ठेवावी. सरावाला जरूर जावे, तिथे थोडी गोलंदाजी करावी किंवा क्षेत्ररक्षणाचा सराव करावा, पण फलंदाजी मात्र करू नये. मला खात्री आहे की, अभिषेकने इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीसाठी काहीतरी खास राखून ठेवले आहे.’