आर अश्विन  Twitter
स्पोर्ट्स

अश्विन ‘अण्णा’ने अनिल कुंबळेला टाकले मागे! चेन्नई कसोटीत रचला इतिहास

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आहे. 515 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला दुसऱ्या डावात केवळ 234 धावा करता आल्या, त्यामुळे भारताने 280 धावांनी सामना जिंकला. यादरम्यान भारतीय गोलंदाजांनी दोन्ही डावात चमकदार कामगिरी करत बांगलादेशच्या फलंदाजांना जखडून ठेवले. अशा परिस्थितीत पहिल्या डावात गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर दुसऱ्या डावात अश्विन ‘अण्णा’ने अप्रतिम गोलंदाजी करत 21 षटकात 88 धावा देत सर्वाधिक 6 बळी घेतले. यासह त्याने चेन्नई कसोटीत मोठ्या विक्रमाची नोंद केली. (R Ashwin Record in IND vs BAN Chennai Test)

अश्विनच्या शानदार गोलंदाजीमुळे भारताने हा सामना जिंकला. या विजयामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील प्रवेश अगदी जवळ आला आहे. अशा परिस्थितीत आर अश्विन आता कसोटी सामन्याच्या एका डावात 5 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाजाचा सर्वात वयस्कर गोलंदाज ठरला आहे. अश्विनने या यादीत माजी भारतीय दिग्गज अनिल कुंबळे आणि विनू मांकड यांना मागे टाकले आहे. अश्विनने चेन्नई कसोटीत बॉल आणि बॅटने अप्रतिम कामगिरी केली आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याने शानदार शतक झळकावले होते. त्याच्या या दमदार कामगिरीने भारतीय डाव सावरला होता.

अश्विनने कोर्टनी वॉल्शला टाकले मागे

आर अश्विन हा कसोटी डावात 5 बळी घेणारा सर्वात वयस्कर भारतीय गोलंदाज ठरला आहे. यासह त्याने माजी कॅरेबियन दिग्गज गोलंदाज कोर्टनी वॉल्श यांचा विक्रम मोडीत काढला आहे. वॉल्श यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 519 विकेट्स आहेत. आता अश्विन त्यांच्या पुढे गेला असून त्याच्या नावावर 522 विकेट्स जमा झाल्या आहेत. यास तो सर्वाधिक बळी घेणा-या गोलंदाजांच्या यादीत 8व्या स्थानी पोहचला आहे. त्याच्या पुढे ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायन (530 विकेट) आहे.

चौथ्यांदा शतक आणि 5 विकेट्स

अश्विनने कसोटीत शतक झळकावून 5 विकेट घेण्याची ही चौथी वेळ आहे. एकाच कसोटीत शतक आणि विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू इयान बॉथम पहिल्या क्रमांकावर आहे. बोथमने हा पराक्रम 5 वेळा केला आहे. तर वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज गॅरी सोबर्स, पाकिस्तानचा मुश्ताक मोहम्मद, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस, बांगलादेशचा शाकिब अल हसन आणि भारताचा रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोनदा हा पराक्रम केला आहे.

अश्विनने पहिल्या डावात 133 चेंडूत 113 धावांची शानदार खेळी खेळली होती. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले. बांगलादेशच्या पहिल्या डावात रवी अश्विनला विकेट घेण्यात अपयश आले. मात्र या ऑफस्पिनरने दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन केले. बांगलादेशच्या दुसऱ्या डावात रवी अश्विनने 6 विकेट घेतल्या. त्याचवेळी भारतीय संघाने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे भारतीय संघ 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT