टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. तब्बल ११ वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. भारताने २००७ नंतर दुसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. स्पर्धेनंतर आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ निवडला आहे. यामध्ये सहा भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला. यापूर्वी 2007 मध्ये तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिले विजेतेपद पटकावले होते. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. यामुळेच सहा भारतीयांना आयसीसी टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये स्थान मिळाले आहे. आश्चर्य म्हणजे अंतिम फेरीत भारतासाठी ७६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणाऱ्या विराट कोहलीला स्थान मिळालेले नाही.
आयसीसीने निवडलेल्या विश्वातील सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंमध्ये संघात सहा भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे. तसेच अफगाणिस्तानचे तीन आणि वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. यामध्ये रोहित शर्मा आणि रहमानउल्ला यांची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. यंदाच्या T२० विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी रोहितने सर्वाधिक धावा (२५७ धावा) केल्या, तर गुरबाज हा या स्पर्धेतील सर्वोत्तम धावा करणारा फलंदाज ठरला. . तिसऱ्या क्रमांकावर आयसीसीने वेस्ट इंडिजचा झंझावाती फलंदाज निकोलस पूरन तर चौथ्या क्रमांकावर भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला स्थान दिले आहे. सूर्यकुमार यावदने या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक (199 धावा) धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याशिवाय हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांचा या संघात समावेश आहे. या चार खेळाडूंनी 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी दमदार कामगिरी केली होती.
रोहित शर्मा, रहमानउल्ला गुरबाज, निकोलस पूरन, सूर्यकुमार यादव, मार्कस स्टोइनिस, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, राशिद खान, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, फजलहक फारुकी.