ब्रिस्टॉल; वृत्तसंस्था : कर्णधार हॅरी ब्रूक (नाबाद ७९) व फिल सॉल्ट (नाबाद ५९) यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या बळावर इंग्लंडने भारतीय संघाचा चौथ्या टी-२० लढतीतही एकतर्फी धुव्वा उडविला आणि पाच सामन्यांची ही मालिका ३-० अशा फरकाने खिशात घातली. पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागल्यानंतर भारताने या मालिकेत सलग तीन पराभव पत्करले आहेत.
श्रेयस अय्यरच्या नाबाद ८० धावांच्या खेळीनंतरही भारताला ७/१५८ अशा किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले. प्रत्युत्तरात इंग्लंडने १३.५ षटकांत केवळ एका गड्याच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले. हॅरी ब्रुकने ३५ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ७९ धावा चोपल्या. तर सॉल्टने ४२ चेंडूंत ५९ धावांची आतषबाजी केली. यादरम्यान, हॅरी ब्रूकचा स्ट्राईकरेट २२५.७१ असा राहिला.
प्रारंभी, कर्णधार श्रेयस अय्यरने एकहाती डाव सावरत ४९ चेंडूंमध्ये नाबाद ८० धावांची वादळी खेळी खेळली आणि याचमुळे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताला २० षटकांत ७ बाद १५८ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, खराब प्रारंभाचा संघाला फटका बसला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी ‘शॉर्ट बॉल’ रणनीतीचा अचूक वापर करत भारताच्या सलामीवीरांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी १० चेंडूंत १५ धावांवर जोफ्रा आर्चरचा बळी ठरला, तर इशान किशन केवळ ४ धावांवर जोश टंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. दोन झटके बसल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे यांनी चौथ्या गड्यासाठी ५३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शिवम दुबेने २३ चेंडूंत २२ धावांचे योगदान दिले. मात्र, या भागीदारीदरम्यान भारताचा धावगतीचा वेग कमालीचा मंदावला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर व टंग यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.