विराट काेहली Pudhari Photo
स्पोर्ट्स

Virat Kohli | कसोटी निवृत्तीवर विराट कोहलीने प्रथमच सोडले मौन; म्हणाला, 'जेव्हा तुम्ही...'

विराट कोहली १२ मे २०२५ रोजी वयाच्या ३६ व्या वर्षी जाहीर केली हाेती कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

पुढारी वृत्तसेवा

Virat Kohli Breaks Silence On Test Retirement : टीम इंडियाचा वन-डेमधील स्‍टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने १२ मे २०२५ रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. वयाच्या ३६ व्या वर्षी त्‍याने कसोटी क्रिकेटला केलेला अलविदा क्रिकेट विश्‍वासह त्‍याच्‍या चाहत्‍यांसाठी मोठा धक्‍का होता. मात्र आपण कसोटी क्रिकेटमधून कोणत्‍या कारणासाठी निवृत्त होत आहोत, याचा खुलासा त्‍याने केला नव्‍हता. आता प्रथमच त्‍याने याबाबत जाहीरपणे भाष्य केले आहे.

युवराज सिंगच्या 'यूवीकॅन'च्‍या कार्यक्रमाला विराटची उपस्‍थिती

विराट कोहलीने माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगच्या 'यूवीकॅन' (YouWeCan) या संस्थेसाठी आयोजित एका धर्मादाय कार्यक्रमात कोहलीने हजेरी लावली. यावेळी तो त्याचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघातील माजी सहकारी ख्रिस गेलसह क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गजांसोबत दिसला. या कार्यक्रमाला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह संपूर्ण क्रिकेट संघ उपस्थित होता. तसेच रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, केविन पीटरसन, ब्रायन लारा आणि आशिष नेहरा यांसारख्या महान खेळाडूंचीही मांदियाळी होती.

जेव्हा तुम्हाला दर चार दिवसांनी दाढी रंगवावी लागते...

कार्यक्रमाचे सूत्रसंचालक गौरव कपूर यांनी विराट कोहलीला मंचावर आमंत्रित केले आणि त्याच्याकडून कसोटी निवृत्तीवर प्रतिक्रिया मिळवण्यात यश मिळवले. गौरवने म्हटले की, मैदानावर प्रत्येकजण विराटला खूप मिस करतो, यावर विराटने आपले मौन सोडले. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार विराट कोहली म्हणाला की, "मी दोन दिवसांपूर्वीच माझ्या दाढीला रंग लावला. जेव्हा तुम्हाला दर चार दिवसांनी दाढी रंगवावी लागते, तेव्हा समजून जावे की आता वेळ आली आहे."

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींबद्दल कृतज्ञता

यावेळी विराटने पुन्हा एकदा माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचे आभार मानले. सुरुवातीच्या काळात शास्त्रींनी ज्याप्रकारे प्रोत्‍साहन दिले आणि एक उत्तम क्रिकेटपटू बनण्यास मदत केली, त्याबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली. तो म्‍हणाला, "प्रामाणिकपणे सांगायचे तर, जर मी त्यांच्यासोबत काम केले नसते तर कसोटी क्रिकेटमध्ये माझी कारकीर्दीत जे काही घडले ते शक्य झाले नसते. आमच्या दोघांमध्ये जी वैचारिक स्पष्टता होती, ती मिळणे खूप कठीण आहे. कोणत्याही क्रिकेटपटूच्या कारकिर्दीत प्रगती करण्यासाठी हे सर्वकाही आहे. त्यांनी ज्याप्रकारे मला पाठिंबा दिला. पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी स्वतः पुढे येऊन टीका सहन केली. जर तसे झाले नसते तर गोष्टी वेगळ्या असत्या. माझ्या क्रिकेट प्रवासाचा एक अविभाज्य भाग असल्याबद्दल माझ्या मनात त्यांच्याविषयी नेहमीच आदर आणि सन्मान राहील, असेही विराटने यावेळी नमूद केले.

युवराजसोबतच्या आठवणींना उजाळा

भारतीय संघातील सुरुवातीला युवराज सिंग, हरभजन सिंग, झहीर खान यांसारख्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करत असतानाच्‍या दिवसांना विराटने यावेळी उजाळा दिला. तो म्हणाला, "आमचे मैदानावर आणि मैदानाबाहेर खूप चांगले संबंध होते. बंगळूरमधील एका नॉर्थ झोन स्पर्धेदरम्यान मी त्याला पहिल्यांदा भेटलो. मी भारताकडून खेळायला सुरुवात केली तेव्हा त्याने, भज्जू पा आणि झहीर खान यांनी मला आधार दिला. एक खेळाडू म्हणून माझी जडणघडण होण्यास त्यांनी खूप मदत केली, ड्रेसिंग रूममध्ये मला सहज वावरता येईल असे वातावरण निर्माण केले. मैदानाबाहेर आम्ही खूप धमाल केली आणि अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या जीवनशैलीची त्यांनी मला जाणीव करून दिली. विश्वचषकात त्याला खेळताना पाहणे खूप खास होते आणि त्यानंतर जे काही आम्हाला कळले तो एक धक्का होता. त्याच्या इतके जवळ असूनही... आम्हाला काहीच कल्पना नव्हती. त्यानंतर त्याचा कर्करोगाशी लढा आणि पुन्हा एकदा तो खरा चॅम्पियन असल्याचे सिद्ध करत... मी संघाचे नेतृत्व करत असताना त्याने संघात पुनरागमन केले, असेही विराट म्‍हणाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT