बार्बाडोस; वृत्तसंस्था : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप 2024 च्या साखळी टप्प्यात चमकदार कामगिरी केली आणि तिन्ही सामने जिंकून सुपर-8 मध्ये स्थान मिळवले. आता आजपासून (गुरुवारी) भारत वेस्ट इंडिजमध्ये सुपर-8 फेरीचे सामने खेळणार आहे, ज्याची सुरुवात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याने होईल.
उभय संघांमधील हा सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवला जाईल. हवामानाचा अंदाज पाहिल्यास पुढील काही दिवस ब्रिजटाऊनमध्ये आकाश ढगाळ राहील. सामन्याच्या दिवशी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना एकेक गुण देण्यात येणार आहे. कारण, सुपर-8 फेरीसाठी राखीव दिवसाची सोय नाही.
टी-20 वर्ल्डकप 2024 चा सुपर-8 2 गटांत विभागला गेला आहे. गट-1 मध्ये अमेरिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका आहे, तर ग्रुप-2 मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगला देश या संघांचा समावेश आहे. आता ही स्पर्धा आणखीनच रोमांचक होणार आहे.
आता या 8 संघांमध्ये उपांत्य फेरी गाठण्याची लढाई रंगणार आहे. एका गटात असलेल्या 4 संघांना 3-3 सामने खेळावे लागतील. उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी संघांना किमान 2-2 सामने जिंकावे लागतील. टीम इंडियाने ग्रुप-1 मधील तिन्ही सामने जिंकले, तर जास्तीत जास्त गुणांच्या आधारे ते थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर-8 सामना 20 जून रोजी होणार आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल. असे झाल्यास टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात. कारण, त्यांचा दुसरा सामना बांगला देशविरुद्ध आणि तिसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. ऑस्ट्रेलिया नेहमीच भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला अफगाणिस्तान आणि बांगला देशला पराभूत करून हक्काचे 4 गुण मिळवून सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करायचे आहे.