नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आयपीएलच्या 'रन'धुमाळीत आता बीसीसीआयने (BCCI) एक मोठा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांत खेळाडूंना देण्यात येणार्या बक्षिसांची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएल सुरू असताना आता खेळाडूंसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हे मोठे गिफ्ट दिले आहे.
नव्या निर्णयानुसार आता यावर्षी प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना पाच कोटी रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. रणजी करंडक स्पर्धेतील विजेत्यांना आतापर्यंत दोन कोटी रुपयांचे बक्षीस दिले जात होते. त्यात आता वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले, की देशांतर्गत क्रिकेट हे भारतीय क्रिकेटचा कणा असून, सर्व देशांतर्गत स्पर्धांच्या बक्षीस रकमेत वाढीची घोषणा करताना खूप आनंद होत आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुंतवणुकीचे प्रयत्न आम्ही कायम ठेवणार आहोत. रणजी विजेत्यांना आता पाच कोटी (दोन कोटीवरून), वरिष्ठ गट महिला विजेत्यांना 50 लाख रुपयांचे (6 लाखांवरून) बक्षीस मिळणार आहे. देशांतर्गत क्रिकेटच्या मोसमाला दुलीप करंडक स्पर्धेने 28 जूनला प्रारंभ होणार आहे. रणजी करंडक स्पर्धा पुढील वर्षी 5 जानेवारीपासून सुरू होईल. (BCCI)
इराणी करंडक विजेत्यांना 25 लाखांऐवजी आता 50 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. उपविजेत्यांना आता 25 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. उपविजेत्यांना यापूर्वी रोख बक्षीस नव्हते. तर दुलीप करंडक विजेत्यांना एक कोटी रुपयांचे, तर उपविजेत्यांना 50 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. विजय हजारे करंडक विजेत्यांना एक कोटी रुपयांचे आणि उपविजेत्यांना 50 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे, तर देवधर करंडक विजेत्यांना 40 लाख रुपयांचे, तर उपविजेत्यांना 20 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल. त्यानंतर सईद मुश्ताक अली स्पर्धेतील विजेत्यांना 80 लाख रुपयांचे, तर उपविजेत्यांना 40 लाखांचे बक्षीस मिळणार आहे.