भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. गायकवाड यांना ब्लड कॅन्सर झाला असून त्यांच्यावर लंडनच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीसीसीआयने त्यांना १ कोटची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड हे कॅन्सर (कर्करोग) सारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहेत. जीवन-मरणाची लढाई लढत असणार्या अंशुमन गायकवाड यांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी 'बीसीसीआय'ला केले आहे.
अंशुमन गायकवाड यांनी दोनवेळा टीम इंडियाचे प्रशिक्षकपद भूषवले होते. त्याच्या कार्यकाळात सचिन तेंडुलकरची कारकीर्द खर्या अर्थाने बहरली होती. मागील वर्षी गायकवाड यांना ब्लड कॅन्सरने ग्रासले. सध्या त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांनी पुढील उपचारासाठी बीसीसीआयकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी गायकवाड यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांची प्रकृती जाणून घेतली. यानंतर बीसीसीआयने त्यांना १ कोटची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आम्ही गायकवाड यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. या आव्हानात्मक काळात माजी खेळाडूच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही बीसीसीआयने दिले आहे.
कपिल देव आणि संदीप पाटील या माजी क्रिकेटपटूंनी गायकवाड यांच्या मदतीसाठी पुढे आले होते आणि बीसीसीआयला गायकवाड यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. माजी सहकारी मोहिंदर अमरनाथ, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, मदन लाल, रवी शास्त्री आणि कीर्ती आझाद गायकवाड यांच्या उपचारासाठी निधी उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, असेही कपिल देव यांनी स्पष्ट केले होते.
अंशुमन गायकवाड यांनी १९७५ ते १९८७ या कालावधीत भारतासाठी ४० कसोटी आणि १५ वन-डे सामने खेळले. १९९७ ते १९९९ आणि पुन्हा २००० भारतीय संघाचे प्रशिक्षक बनले. अनिल कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध एका डावात १० बळी घेण्याचा पराक्रम केला तेव्हा गायकवाड भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मायदेशातील मालिका २-१ अशी जिंकली, तर न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका अनिर्णित राहिली होती.