नवी दिल्ली : ‘बीसीसीआय’ने वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित आगरकर यांच्या नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत मिळवलेले घवघवीत यश पाहता, 2027 च्या वन-डे विश्वचषकापर्यंत त्यांच्याकडे ही जबाबदारी कायम ठेवण्याचा निर्णय बोर्डाने घेतला. त्यांच्या कार्यकाळात भारताने चारपैकी तीन ‘आयसीसी’ जेतेपदे पटकावून जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
ऑक्टोबर 2023 ते मार्च 2026 या काळात आगरकर यांच्या निवड समितीने निवडलेल्या संघांनी दोन टी-20 विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला. ‘बीसीसीआय’च्या एका वरिष्ठ सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, निवडकर्ता चार वर्षांपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो, त्यामुळे त्यांच्या कराराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. निवड समितीच्या कामगिरीवर बोर्ड समाधानी असल्याने हा निर्णय अपेक्षितच होता.
आगरकर यांच्या कार्यकाळात निवड समितीने अनेक ‘कठोर’ निर्णय घेतले. यात प्रामुख्याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची कसोटी निवृत्ती, तसेच अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला टप्प्याटप्प्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती देणे यांसारख्या मोठ्या निर्णयांचा समावेश आहे. तसेच, टी-20 विश्वचषकासाठी शुभमन गिलसारख्या बड्या खेळाडूला वगळून इशान किशनला संधी देण्याचा धाडसी निर्णयही याच समितीने घेतला होता.
2027 च्या 50 षटकांच्या विश्वचषकासाठी संघ नियोजनात सातत्य राहावे, हा ‘बीसीसीआय’च्या या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. आगामी महत्त्वाच्या मालिका आणि विश्वचषकासाठी आगरकर यांच्या अनुभवाचा भारतीय संघाला मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.