स्पोर्ट्स

Asian Games Team India Trouble : एशियन गेम्सपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका! स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर! युवा खेळाडूला थेट एन्ट्री

दिल्ली कॅपिटल्सच्या युवा फिरकीपटूची चांदी, उपांत्यपूर्व फेरीत भारत थेट मैदानात उतरणार

रणजित गायकवाड

मुंबई : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय संघाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती; मात्र आता या संघात अनपेक्षितपणे मोठा बदल करण्यात आला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिका समाप्त झाल्यानंतर भारतीय संघ जपानच्या दौऱ्यावर रवाना होणार असून, तिथे भारतीय संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत मैदानात उतरेल. या महत्त्वाच्या मोहिमेपूर्वीच भारताचा स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला असून, त्याच्या जागी युवा फिरकीपटू विप्रज निगम याला संघात पाचारण करण्यात आले आहे. संघात केवळ हा एकच बदल करण्यात आला असून उर्वरित संघ कायम ठेवण्यात आला आहे.

सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांची मालिका सुरू असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. मात्र, पहिल्याच सामन्यादरम्यान वरुण चक्रवर्तीला दुखापत झाली आणि त्याला या मालिकेतून माघार घ्यावी लागली. ही दुखापत गंभीर असल्याने तो केवळ चालू मालिकेतूनच नव्हे, तर आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतूनही पूर्णपणे बाहेर फेकला गेला आहे. परिणामी, त्याला दीर्घकाळ मैदानाबाहेर राहावे लागण्याची चिन्हे आहेत. चक्रवर्ती सुमारे दोन महिन्यांपूर्वीच दुखापतीतून सावरून मैदानात परतला होता; मात्र केवळ एका सामन्यात चार षटके टाकल्यानंतर त्याला पुन्हा दुखापतीने ग्रासले.

वरुण चक्रवर्तीच्या अनुपस्थितीमुळे युवा गोलंदाज विप्रज निगमसाठी राष्ट्रीय संघाचे दरवाजे उघडले असून तो प्रथमच वरिष्ठ भारतीय संघात दाखल झाला आहे. अर्थात, त्याला प्रत्यक्ष अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विप्रजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वर्ष २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले होते; त्यावेळी त्याने १४ सामन्यांत ११ बळी टिपले होते. त्यानंतर २०२६ च्या हंगामात त्याला केवळ पाच सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने दोन गडी बाद केले.

दिल्लीच्या संघात आधीपासूनच कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांसारख्या दिग्गज फिरकीपटूंचा समावेश असल्याने विप्रजला अंतिम अकरामध्ये सातत्याने स्थान मिळवणे कठीण गेले होते. विप्रजने आतापर्यंत खेळलेल्या १९ आयपीएल सामन्यांत फलंदाजीतही उपयुक्त योगदान देत १५७ धावा केल्या आहेत.

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी सुधारित भारतीय संघात श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी, यश ठाकूर आणि विप्रज निगम यांचा समावेश करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT