पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा स्टार क्रिकेटर रविचंद्रन अश्विनने (Ashwin) गुरुवारी बांगला देशविरूद्धच्या सामन्यात (दि.19) आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. अश्विनच्या शतकी खेळीमुळे भारताला मोठी धावसंख्या गाठण्यात यश आले. एकेकाळी 34 धावांत तीन विकेट्स गमावलेल्या भारताचा डाव यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत यांच्या भागीदारीने सावरला होता. त्यानंतर अश्विन आणि जडेजाच्या विक्रमी भागीदारीने संघाला 300 च्या पुढे नेले. आपल्या सहाव्या शतकासह अश्विनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला. कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात हा विक्रम यापूर्वी कोणीही केला नव्हता. चला जाणून घेऊया या विक्रमाबद्दल...
अश्विनने सहा शतकांव्यतिरिक्त कसोटीत आतापर्यंत 14 अर्धशतके आणि 6 शतके झळकावली आहेत. अश्विनने 36 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात 20 वेळा 50 हून अधिक धावा धावा आणि 36 सामन्यांत पाच बळी घेणारा तो पहिला क्रिकेटर आहे.
विशेष म्हणजे त्याने घरच्या मैदानावर ही कामगिरी केली. चेन्नईच्या मैदानावरील हे त्याचे दुसरे शतक ठरले. त्यावेळी भारताची धावसंख्या सहा विकेट्सवर 144 धावा होती. यानंतर जडेजा आणि अश्विनने बांगला देशची गोलंदाजी उद्ध्वस्त करत अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात जलद शतक झळकावले.
अश्विनने आठव्या क्रमांकावर किंवा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना कसोटी सामन्यांमध्ये चार शतके झळकावली आहेत. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅनियल व्हिटोरी याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके आहेत. यामध्ये आठव्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना पाच शतके आहेत. ३८ वर्षीय अश्विनचा चेपॉक स्टेडियमवर उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. पाच कसोटींच्या सात डावांमध्ये अश्विनने 55 पेक्षा जास्त सरासरीने 330+ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
अश्विनने चेपॉकमध्ये 23.60 च्या सरासरीने 30 विकेट्स घेतल्या आहेत. 103 धावांत सात बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. अश्विन गारफिल्ड सोबर्स (वेस्ट इंडिज), कपिल देव (भारत), ख्रिस केर्न्स (न्यूझीलंड) आणि इयान बॉथम (इंग्लंड) यांच्यासारख्या अव्वल अष्टपैलू खेळाडूंमध्ये सामील झाला आहे ज्यांनी एकापेक्षा जास्त पाच बळी आणि अनेक शतके झळकावली आहेत.