R Ashwin Advice To Rishabh Pant: भारताचा विकेटकिपर आणि लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत सध्या दबावात दिसत आहे. आयपीएल २०२६ च्या पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर संघमालक गोयंका आणि पंत यांच्यात शाब्दिक देवाण घेवाण झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. दरम्यान, पंतच्या मदतीला आता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आर अश्विन धावून आला आहे. त्याने पंतला एक मोलाचा सल्ला दिला आहे.
आयपीएलच्या नव्या हंगामात ऋषभ पंतची बॅटिंग ऑर्डर हा एक चर्चेचा विषय झाला आहे. गेल्या हंगामात पंतला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्याला आपल्या कामगिरीत सातत्य राखता येत नाहीये. नुकत्याच झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात पंत स्वतः वरचा फळीत खेळण्यासाठी आला होता. मात्र त्याला त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.
पंत मिचेल मार्शसोबत सलामीला आल्यामुळं फॉर्ममध्ये असलेल्या मार्करमला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. मात्र पंतला पहिल्या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पंत पॉवर प्लेमध्ये खेळताना सहज वाटत होता. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही.
दरम्यान, अश्विनने अशा परिस्थितीत पंतला एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्याने पंतला सलामीला येण्याचा निर्णय बदलू नये असं सांगितलं आहे.
अश्विनने आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, 'ऋषभ पंत बाद झाला हे खूप दुर्दैवी होतं. मात्र तो सामन्यानंतर जसं बोलत होते ते देखील जास्तच दुर्दैवी होतं. तू पुन्हा सलामीला खेळणार का असं विचारण्यात आलं त्यावेळी तो 50-50 शक्यता असं म्हणाला. मी त्याला हात जोडून विनंती करू इच्छितो की तू प्रत्येक सामन्यात सलामीला ये. जस्टीन लँगर किंवा लखनौच्या संघ व्यवस्थापनातील कोणीही जाऊन पंतला सांगायला हवं की तू जा आणि पॉवर प्लेमध्ये मुक्तपणे खेळ. सर्व १४ साखळी सामने सलामीलाच खेळ.'
अश्विन पुढे म्हणाला की, 'जर पंत पॉवरप्लेनंतर खेळायला आला तर गोलंदाजांनी त्याच्याविरूद्ध रणनिती आखलेली असेल. मला वाटतं की त्याने लखनौसाठी आणि स्वतःसाठी देखील सलामीला फलंदाजी करावी.'
ऋषभ पंतचे आयपीएलमधील सलामीवीर म्हणून रेकॉर्ड देखील मर्यादितच आहे. त्याने सहा डावात सलामीला फलंदाजी केली होती. त्याने २२.०० ची सरासरी आणि १२८.१६ च्या स्ट्राईक रेटने १३२ धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
जरी अश्विनने हात जोडून विनंती केली असली तरी पंतने तो सलामीला खेळणार की नाही हे अजून निश्चित नाही असे संकेत दिले आहेत. तो दिल्लीविरूद्धच्या पराभवानंतर म्हणाला की, 'सलामीला येण्याबाबत अजूनही ५०-५० कॉल आहे. मात्र तुम्ही नक्कीच मला या हंगामात टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना पाहाल.'