Abhishek Sharma’s Health Update: वर्ल्ड कप सुरू असतानाच टीम इंडियासाठी धक्कादायक बातमी आहे. भारताचा सलामी फलंदाज अभिषेक शर्माला पोटाच्या संसर्गामुळे दिल्लीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सोमवारी अचानक तब्येत बिघडल्यानंतर अभिषेकला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. प्राथमिक तपासणीत स्टमक इन्फेक्शन असल्याचं स्पष्ट झालं आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू असून सध्या त्याला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. मंगळवार रात्रीपर्यंत तो रुग्णालयातच होता. त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत मेडिकल अपडेट देण्यात आलेले नाहीत.
टीम मॅनेजमेंट आणि चाहते दोघेही अभिषेकच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून आहेत. पुढील तपासणीनंतर त्याला डिस्चार्ज द्यायचा की नाही, याचा अंतिम निर्णय डॉक्टर घेणार आहेत.
भारताचा पुढचा लीग सामना 12 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये नामीबिया विरुद्ध होणार आहे. मात्र अभिषेक अजूनही पोटाच्या त्रासातून सावरत असल्यामुळे मंगळवारच्या सराव सत्राला उपस्थित राहू शकला नाही. भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट यांनी याबाबत सांगितलं की, “अभिषेकला अजून थोडासा त्रास आहे. पण सामना होईपर्यंत तो फिट होईल, अशी आम्हाला आशा आहे.”
मंगळवारी संध्याकाळी फ्लडलाइट्सखाली झालेल्या सरावात इशान किशन सर्वात आधी फलंदाजीसाठी उतरला, तर त्याच्यासोबत पेस बॉलिंग नेटमध्ये संजू सॅमसन दिसला. दोघांनी हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अर्शदीप सिंग यांच्यासह नेट गोलंदाजांचा सामना केला. दुसऱ्या नेटमध्ये सूर्यकुमार यादव आणि टिलक वर्मा यांनी देखील फलंदाजी केली.
गेल्या काही सामन्यांत ईशान किशन चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळे संजू सॅमसनला पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. मात्र नेट्समध्ये संजूने जवळपास अर्धा तास फलंदाजी करत तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत दिलासादायक अपडेट मिळाली आहे. टेन डोशेट यांच्या म्हणण्यानुसार, बुमराह 10 दिवस गोलंदाजीपासून दूर होता, पण आता त्याला बरं वाटत असून सरावात त्याने जवळपास 25 मिनिटं पूर्ण ताकदीने गोलंदाजी केली. यानंतर रिंकू सिंग, शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांनीही नेट्समध्ये फलंदाजी केली.
सध्या सर्वांचं लक्ष अभिषेक शर्माच्या हेल्थ अपडेट आणि अंतिम प्लेइंग इलेव्हनकडे लागलं आहे. जर अभिषेक वेळेत फिट झाला नाही, तर त्याच्या जागी संजू सॅमसन ओपनिंग करताना दिसू शकतो. थोडक्यात सांगायचं तर, भारत-नामीबिया सामन्याआधी टीम इंडियासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अभिषेक लवकर बरा व्हावा, अशीच चाहत्यांची आणि संघ व्यवस्थापनाची अपेक्षा आहे.