आज यशस्वी कलाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागर कारंडेच्या आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा ना नोकरी होती ना आर्थिक स्थैर्य. त्या कठीण काळातही त्याच्या पत्नीने त्याच्यावर विश्वास ठेवत लग्नासाठी होकार दिला. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्याची ही वाचनीय कहाणी...
Valentine’s Day special Sagar Karande marriage Story
व्हॅलेंटाईन डे म्हटलं की प्रेम, नातं आणि एकमेकांवर असलेला विश्वास यांची आठवण होते. अशाच एका विश्वासावर उभी असलेली प्रेमकहाणी म्हणजे मराठी अभिनेता आणि विनोदवीर सागर कारंडेची लव्ह स्टोरी. आज सागर कारंडे यशस्वी कलाकार म्हणून ओळखला जात असला, तरी त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा काळ खूपच संघर्षाचा होता.
एका मुलाखतीत सागर कारंडेने त्यांच्या आयुष्यातील त्या कठीण दिवसांचा उल्लेख केला होता. तो म्हणाला होता की, “त्या काळात ना माझ्याकडे नोकरी होती, ना हातात पैसे. अभिनयात काहीतरी करायचं होतं, पण भविष्य अनिश्चित होतं.” अशा परिस्थितीतही त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि लग्नासाठी होकार दिला, ही गोष्ट अनेकांच्या मनाला भिडणारी आहे.
मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा विनोदवीर म्हणून सागर कारंडेचे नाव गाजलेले. त्याची कॉमिक शैली, कॉमिक टाईम, उत्तम अभिनय आणि प्रेक्षकांना खुर्ची खिळवून ठेवण्याची ताकद असलेल्या सागर कारंडेच्या लव्ह स्टोरीविषयी तुम्हाला माहितीये का? अर्थात अरेंज मॅरेज असलेल्या सागर कारंडेची पत्नी त्याच्या करिअर घडताना खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिलीय. कलाविश्वात नाव कमावताना सागरकडे काहीच नसताना सागरची पत्नी त्याच्यामागे ढाल बनून उभी राहिली. म्हणून तर सागर कारंडे आपल्या पत्नीला सोन्यासारखी बायको म्हणतो. सागरच्या पत्नीचे नाव सोनाली कारंडे असं आहे. ती फार लाईमलाईटमध्ये नसते.
फु बाई फु, चला हवा येऊ द्या असे मराठी शो, मराठी चित्रपट, नाटकांमधून त्याने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावलं. हीच तर फॅमिलीच गंमत आहे, हे त्याचे नाटक चांगलेच गाजले.
त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं- 'लग्नाला एक महिना बाकी होता. सागरच्या पत्नीचा फोन आला. ती म्हणाली मला भेटायचं आहे. म्हणजे सागरला ती दुसऱ्यांदा भेटणार होती. सागर म्हणाला, का भेटायचंय. ती म्हणाली-तुम्हाला एक सांगायचं आहे. सागर म्हणाला, आता सांग काय ते. त्याला वाटलं की, आता ती लग्न मोडते.'
सागर कारंडेची पत्नी म्हणाली की, सागर पिंक कलरचा फॉर्मर शर्ट घालून स्वीट बॉय सारखे आले होते. एखादी व्यक्ती १० वर्षे राहूनदेखील आवडत नाही आणि एखादी व्यक्ती १० मिनिटात आवडते. ते लगेच आवडले. १० मिनिटात आम्ही एकमेकांना होकार दिला.
सागरने त्याची लग्नावेळची खरी परिस्थिती सांगितली. तो म्हणाला, त्यादिवशी मी कमवत देखील नव्हतो. माझ्याकडे काहीच नव्हतं. माझ्याकडे नाटक नव्हतं, सीरीयल नव्हती, काम नव्हतं. मी स्ट्रगल करत होतो. ती माझ्याकडे आली आणि म्हणाली- तुम्हा जे हवंय ते करा. मी तुमच्यासोबत आहे. शिवडीला तिने मला शब्द दिला होता. तिचे हे शेवटचे वाक्य मला अजुन देखील आठवतं.
सागरला कामे कशी मिळत गेली, याबद्दल तो म्हणाला- माझे लग्न झाल्यापासून मला कामे मिळत गेली. फू बाई फू लग्नानंतर लगेच मिळाले. मुलीचा जन्म झाल्यानंतर आयुष्याला चारचाँद लागले. दोघीही लक्ष्मीच्या पावलांनी माझ्या घरात आल्या. म्हणूनच तर सोनाली म्हणते- सोन्यासारखा माणूस भेटला.
सागर कारंडेच्या पत्नीने गिफ्टविषयी सांगितलं की- सागर कधीही तिच्यासाठी गिफ्ट घेऊन आला की, त्याची पत्नी आधी विचारते-कितीला आणलं आहे? यावर मिश्किलपणे सागर म्हणतो की-'आधी गिफ्ट घे..किंमतीचं काय आहे?' सागर कारंडे आणि सोनाली कारंडेला एक मुलगी आहे, जिने नाव सई आहे.
सागर कारंडे कॉमेडी, मिमिक्री, विनोदी अभिनयासाठी ओळखला जातो. तो एक अनुभवी रंगभूमी कलाकार देखील आहे. फू बाई फू या कार्यक्रमात त्याने भारत गणेशपुरे बरोबर केलेले विविध विनोदी सादरीकरण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. यानंतर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात त्याने विविधांगी विनोदी भूमिका सादर केल्या आहेत. विशेषतः पोस्टमन म्हणून त्याने केलेले विविध भागातील पत्र वाचन हृदयस्पर्शी ठरले होते.
जलसा, फक्त लढ म्हणा, बायोस्कोप, माय हिंदू फ्रेंड, कुतुब, एक तारा, चल धरपकड, बाई गं यसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. सध्या तो रिअॅलिटी शो Bigg Boss Marathi Season 6 मध्ये स्पर्धक म्हणून दिसतो आहे. तर जस्ट हलका फुलका आणि गणपती बाप्पा मोरया सारखी नाटके त्याच्या नावावर आहेत.