पुढारी ऑनलाईन डेस्क - स्टार प्रवाहवर नवी मल्टीस्टारर मालिका लग्नानंतर होईलच प्रेम भेटीला येत आहे. मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय आंदळकर, अविनाश नारकर, ऋजुता देशमुख, कश्मिरा कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर, प्रसन्न केतकर, संयोगिता भावे, आभा वेलणकर, विशाल कुलथे, श्रेयस कदम, स्नेहल चांदवडकर अश्या अनेक दमदार कलाकारांची फौज या मालिकेत आहे.
जवळपास ४ वर्षांनंतर मृणाल दुसानिस या मालिकेतून पुनरागमन करणार आहे. नंदिनी मोहिते पाटील असं तिच्या व्यक्तिऱेखेचं नाव असून समाजकार्याची आवड असणारी आणि सतत इतरांच्या हितासाठी झटणारी तिची व्यक्तिरेखा आहे. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अप्पू म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकर या मालिकेत मृणालच्या बहिणीची म्हणजेच काव्या मोहिते पाटील ही भूमिका साकाणार आहे. हजरजबाबी, प्रेमळ आणि खोडकर असणारी काव्या आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असते. देवयानी नंतर जवळपास ८ वर्षांनंतर विवेक सांगळे मालिकेत दिसणार आहे. मिश्किल स्वभावाचं जन्मेजय हे पात्र तो या मालिकेत साकारणार आहे. पिंकीचा विजय असो मालिकेतला युवराज म्हणजेच अभिनेता विजय आंदळकर या मालिकेत जन्मेयजच्या मोठ्या भावाची म्हणजेच पार्थ देशमुख ही भूमिका साकारणार आहे. शांत आणि सुस्वभावी असणारा पार्थ सहसा कुणाच्या वाकड्यात शिरत नाही. वेगवेगळ्या स्वभावाच्या या व्यक्तिरेखा कशा एकत्र येतात हे पहाणं उत्सुकतेचं असेल.
लग्नानंतर होईलच प्रेम प्रमाणे अर्णव आणि ईश्वरीच्या प्रेमाची गोष्ट देखील भेटीला येणार आहे. मालिकेचं नाव आहे तू ही रे माझा मितवा. या मालिकेतल्या अर्णव आणि ईश्वरी या दोघांची प्रेम कहाणी थोडी हटके आहे. थोडक्यात प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव आणि ईश्वरीची हटके लव्हस्टोरी म्हणजे तू ही रे माझा मितवा ही मालिका. कुण्या राजाची गं तू राणी मालिकेतून घराघरात पोहोचलेली गुंजा म्हणजेच अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजीत आमकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतील.
लग्नानंतर होईलच प्रेम १६ डिसेंबरपासून सायंकाळी ७ वाजता आणि तू ही रे माझा मितवा २३ डिसेंबरपासून रात्री १०.३० वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.