पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री दीपा परब हिने जवळपास १४ वर्षानंतर पुन्हा एकदा 'तू चाल पुढं' या मालिकेतून मराठीत कमबॅक केलं. या मालिकेची गोष्ट आहे एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची. एकत्र कुटुंब असलेल्या या घरी अश्विनीलादेखील त्यांच्या नवीन घरासाठी आणि कुटुंबासाठी खारीचा वाटा उचलण्याची इच्छा आहे. ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. कारण आता प्रेक्षकांना आपलीशी वाटणाऱ्या अश्विनीचा ग्लॅमरस प्रवास सुरु होतोय. अश्विनी आता एका नव्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे.
प्रोमोमध्ये सगळ्यांनी ग्लॅमरस अश्विनीला पाहिलं. अश्विनीची ही भूमिका सर्वसमावेशक आहे. कुटुंबातील सदस्य त्यांचे स्वभाव, तिचं घराप्रती कर्तव्य ह्या सर्व गोष्टींची सांगड घालून समंजसपणे घरातील नाती सांभाळून घेणाऱ्या अश्विनीचा नवीन प्रवास सुरु होतोय. अश्विनी मिस इंडिया २०२३ मध्ये भाग घेऊन एक नवीन प्रवासाकडे वळणार आहे. अश्विनीला या नवीन रूपात पाहणे रोमांचक असणार आहे.