पुढारी ऑनलाईन डेस्क - के सी बोकाडिया आणि अनुपम खेर (Anupam Kher) स्टुडिओची निर्मिती आणि गजेंद्र अहिरे यांचं दिग्दर्शन असलेला ‘द सिग्नेचर’ 4 ऑक्टोबर रोजी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. झी ५ ने आज ‘द सिग्नेचर’ या नव्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च केला. या सिनेमात अनुपम खेर, महिमा चौधरी, नीना कुलकर्मी, अन्नू कपूर आणि रणवीर शौरी असे दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत.
‘द सिग्नेचर’मध्ये आपल्या पत्नीवर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि अचानक उद्भवलेल्या आरोग्याच्या संकटात तिला वाचवण्यासाठी अविरत लढणाऱ्या पतीची भावनिक गोष्ट पाहायला मिळणार आहे. पण हृदय पिळवटून टाकणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे त्यानं केलेला सर्व त्याग पणाला लागतो.
ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे अरविंद (अनुपम खेर) आणि त्यांची पत्नी बऱ्याच काळापासून वाट पाहात असलेल्या परदेशात सहलीला निघालेले असतात. मात्र, अचानक विमानतळावर त्यांची पत्नी कोसळते. मध्यमवर्गीय उत्पन्नातून वाचवलेला सगळा पैसा तिला वाचवण्यासाठी खर्च करण्याचं ठरवतात. दुरावलेली मुलं आर्थिक मदत देण्याचं नाकारत त्यांच्या सह- मालकीचं घर विकायलाही नकार देतात. ते आपले जवळचे मित्र, जुन्या परिचितांकडे पैसे मागतात आणि ते ही अशा कठीण काळात त्यांची मदत करायला येतात. अशातच डीएनआर फॉर्म (Do Not Resuscitate) भरायची वेळ आल्यामुळे हा भावनिक संघर्ष आणखी तीव्र होतो. वेळ आल्यानंतर तिला जाऊ द्यायचं की आशेवर कायम राहायचं अशा विचित्र कात्रीत ते अडकतात. ते कशाची निवड करतील? आणि त्यासाठी काय किंमत द्यावी लागेल?
निर्माते आणि प्रमुख अभिनेते अनुपम खेर म्हणाले, 'अनुपम खेर स्टुडिओने व्यक्तीरेखांवर आधारित सिनेमे दर्जेदार कथाकथन व अनोख्या सिनेमॅटिक अनुभवासह सादर करण्याचे व त्याद्वारे जगभरातील प्रेक्षकांन आपलेसे करण्याचे ध्येय ठेवले आहे. द सिग्नेचर सिनेमात एक मध्यमवर्गीय माणूस साकारला आहे. सारांश सिनेमा असो, खोसला का घोसला असो, संसार असो किंवा सलाखे, मी कायमच प्रत्येक भूमिकेला काहीतरी वेगळेपण देण्याचा प्रयत्न केला आहे. या सिनेमातील माझ्या व्यक्तीरेखेचे वेगळेपण म्हणजे तो आपल्या पत्नीवर समर्पित वृत्तीने प्रेम करतो. इतक्या वर्षांत त्यांचे नाते जोडीदाराच्या पलीकडे गेले आहे. ते एकमेकांचे मित्र झाले आहेत. हेच या व्यक्तीरेखेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. ही कथा सर्वांना आपलीशी वाटेल, कारण त्यामध्ये असंख्य लोकांना आपल्या आयुष्याचे प्रतिबिंब दिसेल. मी सामान्य माणसाच्या आयुष्यावर आधारित दर्जेदार कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बांधील असून हा सिनेमा त्याला अपवाद नाही.'