Teen Payancha Ghoda marathi movie
अनुपमा गुंडे
90 च्या दशकाआधी आपण समाज म्हणून खूप चौकटी लावून जगत होतो. मात्र जागतिकीकरणानंतर भारतात आर्थिक आणि सामाजिक बदलांना सुरुवात झाली. त्याचे पडसाद 2000 च्या दशकातच दिसू लागले. त्या बदलांनी अनेक चौकटी मोडायला सुरुवात केली. अर्थात आज परीक्षण असलेला तीन पायांची घोडा...हा चित्रपट त्यावर थेट भाष्य करत नाही. पण आज सेकंद सेकंदाला बदल अनुभवणाऱ्या पिढीला आणि आज पन्नाशीत असलेल्या पिढीला 2000 च्या दशकातील मैत्री आणि कल्पनांनी भारलेल्या प्रेमाच्या आठवणींची सफर नक्कीच घडवतो.
तीन पायांच्या घोडा...घोडा कुठे तीन पायांचा असतो का...असा बाळबोध प्रश्न चित्रपटाचे नाव ऐकल्यावर निश्चितच वाटते. पण घोडा तीन पायांचा नसला तरी तीन वेगवेगळ्या वातावरणात, संस्कारांत वाढलेले,आपल्या कौटुंबिक प्रश्नांना घेऊन जगणारे आणि जगण्याचं किंवा करिअरचं नेमकं ध्येय हाताशी नसलेले दोन तरुण अदनान (कुणाल शुक्ला), राठोड (अविनाश लोंढे) आणि त्यांची मैत्रीण चंद्रिका (रिया नलावडे) या तिघांभोवती या चित्रपटाची कथा गुंफली आहे. त्यात अदनान हा 5 वेळा प्रयत्न करून बारावी पास झालेला नाही. त्याचे आजोबा निवृत्त पोलीस अधिकारी (गजानन परांजपे) अदनानला तू यंदा बारावी पास झाला नाहीस, तर तुला पुण्यात राहता येणार नाही, असा दम त्याच्या प्रेयसीसमोर देतात.
आपल्या प्रियकराने बारावीच्या पेपरात काय दिवे लावलेत, याचा अंदाज आल्याने चंद्रिका बारावी पासचे बनावट मार्कशीट करून देणाऱ्याच्या शोधात असते. ती कॉलसेंटरमध्ये कार्यरत असते. एका मित्राच्या माध्यमातून ती राठोड या तरुणापर्यंत पोहोचते. चंद्रिका कॉल सेंटरमध्ये काम करत असली तरी तिच्या मनात अभिनेत्री होण्याचं स्वप्न दाटलं आहे, मात्र तरीही नाटक सांभाळून ती जॉब रेटते आहे. मात्र त्यात पुढे जाण्याचं स्वप्न विरत जाते.
अदनानला मात्र भविष्यांच्या स्वप्नांचा वेधच घ्यावासा वाटत नाही, तर डिप्लोमा हाऊन हातात नोकरी नसल्याने राठोड हा तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट कागदपत्रे करण्यात माहीर असतो. या बनावट मार्कशीटच्या गुंत्यात अडकलेले तिघे मैत्रीच्या धाग्यात गुंफले जातात. बनावट मार्कशीट तयार झाल्यानंतर त्याचे सेलिब्रेशन करायला तिघे एकत्र जातात आणि चित्रपट एका वळणावर येतो. त्यानंतर चित्रपटात काय काय घडते, हे चित्रपटगृहात पाहणे गरजेचे आहे.
या चित्रपटात प्रसंग, संवाद आणि नाती वास्तवदर्शी आहेत. 2000 च्या दशकात करिअर ओरिएंटेड नसलेल्या, पण जगण्याचं भान असलेल्या तरुणाईची ही गोष्ट आहे. त्यामुळे नात्यातील पारदर्शकता, सच्चेपणाच्या बळावर जुळलेल्या या तिघांच्या मैत्रीच्या धाग्याची ही गोष्ट सांगण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे. काळ कितीही बदलला तरी मैत्री आणि प्रेमाच्या फुटपट्ट्याचे धागे तसेच असतात. अर्थात त्यातील गंमत, प्रसंग काळाच्या कसोट्यांवर वेगवेगळे असतात. अनेकदा मैत्रीचे अबोल धागे किती घट्ट असतात, त्याची प्रचिती हा चित्रपट देतो.
2001 आणि 2003 मधील पुण्याबरोबरच, मोबाईल आणि त्यावेळी प्रचलित असलेल्या वाहनांच्या आठवणीही हा चित्रपट मैत्रीच्या धाग्याबरोबर जाग्या करतो. सुरुवातीला काहीसा संथ वाटत असला तरी तो कथानकात पुढे काय घडणार आहे,याची उत्कंठा वाढविण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र तरीही चित्रपटातील राठोड, किंवा चित्रपटाचा नायक अदनान याची आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांची मानसिकता यावर भाष्य होण्याची गरज होती.
अदनानचे वडील (संदेश कुलकर्णी) आणि राठोडची आई (देविका दफ्तरदार) यांनी छोट्या भूमिकाही लक्षवेधी केल्या आहेत. सध्या लक्ष्मी निवासमध्ये असलेला नायक कुणाल शुक्लाने या चित्रपटात अदनानची भूमिका व्यक्तिरेखेला समर्पक उभी केली आहे. अविनाश लोंढेचा राठोड आणि बंडखोर वृत्तीची रिया नलावडेही प्रेक्षकांच्या लक्षात राहील अशीच आहे.