मुंबई : पुढारी ऑनलाईन
'नमक हलाल' चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगनंतर सुंदर अभिनेत्री स्मिता पाटीलला अश्रू अनावर झाले होते. या चित्रपटातील एक गाणे पावसात शूट करायचे होते. 'आज रपट जाए तो' असे बोल असणार्या या गाण्यात स्मिता यांना महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत रोमँटिक सीन द्यायचे होते. हे सीन दिल्यानंतर स्मिता पाटील रात्रभर रडल्या होत्या.
१९८२ मध्ये रिलीज झालेला 'नमक हलाल' चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्मिता पाटील यांची मुख्य भूमिका होती. पावसात भिजत 'आज रपट जाए तो' या गाण्याचे शूटिंग करायचे होते. शूटिंग करत असताना स्मिता यांना अस्वस्थ वाटत होते. कारण, पावसामध्ये स्मिता पाटीलला अमिताभ यांच्यासोबत अशी दृश्ये देणे सोपे नव्हते. चित्रपटसृष्टीत अभिनेत्रींसाठी हे सहज असले तरी, स्मितासाठी हे कठीणच होतं.
…अखेर स्मिताने मान्य केलं
अभिनेत्री स्मिता पाटील त्यावेळी साध्या भूमिका साकारत असत. 'नमक हलाल' हा चित्रपट व्यावसायिक होता. गाण्यात रोमँटिक सीन शूट करण्यास त्या तयार नव्हत्या. त्यावेळी अमिताभ यांनी स्मिता यांना समजावलं होतं. त्यांनी स्मिता यांच्याशी बराच वेळ बोलून त्यांची समजूत काढली होती.
गाण्याचं शूटिंग झाल्यानंतर ढसाढसा रडली स्मिता
अमिताभ यांनी समजावल्यानंतरदेखील स्मिता रात्र भर रडल्या होत्या. माझ्याकडून काहीतरी चूक झाली आहे, असं तिला वाटत होतं. हीच गोष्ट मनात धरून ती रडत राहिली.
…असं पूर्ण झालं चित्रपटाचं शूटिंग
स्मिता पाटील दुसर्या दिवशी सेटवर पोहोचली. त्यावेळी अमिताभ यांना लक्षात आले की, स्मिता रडली आहे. परंतु, त्यावेळी स्मिताने व्यावसायिक चित्रपट करायचं ठरवलं. 'नमक हलाल'नंतर स्मिताने अमिताभ यांच्यासोबत 'शक्ती' चित्रपट केला होता.
स्मिताला पडलेलं 'ते' स्वप्न आणि कुलीच्या सेटवर झालेला अपघात
एका मुलाखतीत बिग बी अमिताभ बच्चन म्हणाले होते की, 'कुली चित्रपटाच्या सेटवरच्या माझा अपघाताचा पूर्वाभास स्मिताजींना झाला होता. अपघाताच्या आधी एका रात्री मला स्मिता पाटील यांचा फोन आला होता. त्यांनी माझ्या तब्येतीबद्दल विचारले. मी म्हणालो, माझी तब्येत ठिक आहे. त्यावेळी फोनवर स्मिता घाबरलेल्या होत्या. त्यांनी मला सांगितलं की, मी एक भयानक स्वप्न पाहिलयं, जे तुमच्याबद्दल होतं. म्हणून मी तब्येत विचारण्यासाठी फोन केला. एका दिवसानंतर कुली चित्रपटाच्या सेटवर माझा अपघात झाला.'