Shreya Ghoshal Break from Singing: बॉलीवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषालने अलीकडील एका मुलाखतीत गायनाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. गायक अरिजीत सिंगने प्लेबॅक सिंगिंगमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चेनंतर आता श्रेया घोषालनेही ब्रेक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.
एका मुलाखतीदरम्यान श्रेया घोषालने सांगितले की, स्टेजवर लिप-सिंक करून गाणे ही गोष्ट तिला मान्य नाही. ती म्हणाली की, “लाइव्ह परफॉर्मन्स हा कलाकार म्हणून महत्त्वाचा भाग आहे. ज्या दिवशी मला स्टेजवर लिप-सिंक करावे लागेल, त्या दिवशी मी गाणे थांबवेन.”
श्रेयाने सांगितले की, तिला नेहमीच प्रेक्षकांसमोर गाणं लाइव्ह गायला आवडतं आणि जोपर्यंत आवाज साथ देईल, तोपर्यंत नियमित रियाज करत राहणार. संगीताशी असलेले नाते तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही तिने सांगितलं.
दरम्यान, अरिजीत सिंहच्या प्लेबॅक सिंगिंगमधून ब्रेक घेण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना ती म्हणाली की, तो निर्णय धाडसी आहे. तिच्या मते, अरिजीत सिंह हा संगीताशी मनापासून जोडलेला कलाकार आहे आणि तो नेहमी मनापासून गाणं गातो.
श्रेया म्हणाली की, अरिजीत सिंहची संगीताबद्दलची प्रामाणिकता हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. याच कारणामुळे प्रेक्षक त्याच्याशी इतके जोडलेले आहेत.
लाइव्ह परफॉर्मन्सबद्दल बोलताना तिने कलाकारांच्या जबाबदारीबद्दलही सांगितलं. तिच्या मते कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी स्टेजवर त्याचा परिणाम दिसू नये. प्रेक्षक संगीताकडून आनंद आणि प्रेरणा मिळवण्यासाठी येतात.
श्रेया घोषालचा जन्म पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे झाला. लहान वयापासूनच तिला संगीताची आवड होती आणि अवघ्या चार वर्षांच्या वयापासून तिने संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली.
१६ वर्षाची असताना तिने सिंगिंग रिअॅलिटी शो ‘सारेगामा’ जिंकला. त्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ चित्रपटातील ‘बैरी पिया’ या गाण्यामुळे तिला ओळख मिळाली. या गाण्यासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
श्रेया घोषालने आपल्या कारकिर्दीत 3000 हून अधिक गाणी गायली आहेत. हिंदीसह बंगाली, कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि मराठीसह अनेक भाषांमध्ये तिने गाणी गायली आहेत.
आज ती भारतीय संगीत क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी गायिकांपैकी एक मानली जाते. त्यामुळे तीच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून भविष्यात ती खरोखरच ब्रेक घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.